पंचगंगा नदीमध्‍ये मिसळले जाते सांडपाणी !

नदी प्रदूषणाचा प्रश्‍न कायम

कोल्‍हापूर – प्रतिदिन लाखो लिटर मैलामिश्रित सांडपाणी पंचगंगा नदीमध्‍ये मिसळले जात आहे. त्‍यामुळे नदीकाठी रहाणार्‍या गावकर्‍यांचे आरोग्‍य धोक्‍यात आले आहे. (कुठे आहेत कथित पर्यावरणवादी ?- संपादक) मागील अनेक वर्षांपासून पंचगंगा नदीच्‍या प्रदूषणाचा प्रश्‍न अद्याप सुटलेला नाही. ‘पिकनिक पॉईंट’च्‍या खालून वहाणार्‍या नाल्‍यातून प्रतिदिन सहस्रो लिटर मैलामिश्रित पाणी थेट नदीमध्‍ये मिसळले जात आहे. यासमवेतच राजाराम बंधार्‍याच्‍या दोन्‍ही बाजूंनी सांडपाणी नदीमध्‍ये मिसळते. सांडपाण्‍याचे प्रमाण वाढल्‍याने नदीला पुन्‍हा जलपर्णीचा विळखा वाढत आहे. याविषयी महापालिकेला वारंवार नोटीस दिल्‍या असल्‍याचे महाराष्‍ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्‍या अधिकार्‍यांनी सांगितले. सध्‍या नदीतील पाण्‍याची पातळी न्‍यून झाली आहे; मात्र नदीमध्‍ये मिसळणार्‍या सांडपाण्‍याचे प्रमाण तसेच आहे. त्‍यामुळे प्रदूषणाची दाहकता वाढली आहे.