वटपौर्णिमा – स्‍त्रीच्‍या सन्‍मानाचा सण !

आज ‘वटपौर्णिमा’ आहे. त्‍या निमित्ताने…

ज्‍येष्‍ठ मासातील या पौर्णिमेस विवाहित स्‍त्रिया पतीच्‍या दीर्घायुष्‍यासाठी उपवास करतात आणि वडाची पूजा करून त्‍याला दोरा गुंडाळतात. काही जण स्‍त्री स्‍वातंत्र्याचा मुद्दा उपस्‍थित करून याविषयी प्रश्‍नचिन्‍ह उपस्‍थित करत आहेत. त्‍यामुळे आपल्‍याला या सणामागचे विज्ञान समजून घ्‍यावे लागेल.

कु. अन्‍नदा विनायक मराठे

१. वडाविषयी ‘कृतज्ञता’ व्‍यक्‍त करण्‍याचा दिवस !

मुळात हिंदु धर्म हा विज्ञानाधारितच आहे. ‘त्‍वं ज्ञानमयो विज्ञानमायोऽसि ।’, म्‍हणजे ‘तू ज्ञान (ब्रह्माचे ज्ञान) आणि विज्ञान (ऐहिक जगताचे ज्ञान) आहेस.’ हे अथर्वशीर्षामध्‍ये प्रत्‍यक्ष गणपतीला म्‍हटलेले आहे. त्‍यामुळे हिंदु शास्‍त्रांमध्‍ये सांगितलेली प्रत्‍येक गोष्‍ट ही विज्ञानाधारितच असते. वड आयुर्वेदात अतिशय गुणकारी मानला गेला आहे. अनेक औषधांमध्‍ये याचा उपयोग केला जातो. याखेरीज स्‍त्रियांना होणार्‍या आजारांमध्‍ये आणि गर्भवती स्‍त्रियांच्‍या औषधांमध्‍येही वडाच्‍या विविध भागांचा उपयोग केला जातो. वडाजवळ प्राणवायूचे प्रमाण इतर झाडांपेक्षा अधिक असते. एका संस्‍कृत सुभाषितात म्‍हटले आहे – ‘वडाची सावली उन्‍हाळ्‍यात थंड, तर हिवाळ्‍यात गरम असते.’

२. व्रतांच्‍या माध्‍यमातून इतरांचा विचार केला जाणे !

आपल्‍या भारतीय संस्‍कृतीचा मूळ गाभा हा कुटुंबवत्‍सल आहे.   पत्नी आपल्‍या पतीसाठी एखादी पूजा करते, त्‍याच्‍यासाठी शुभ विचार करते. देवाकडे त्‍याच्‍यासाठी प्रार्थना करते. यातून ती एक प्रकारे आपल्‍या कुटुंबासाठीच शुभकामना करत असते; कारण कोणत्‍याही कुटुंबाला पती-पत्नी दोघेही महत्त्वाचेच आहेत ना ! आपल्‍या संस्‍कृतीत कुठलेही धार्मिक कर्तव्‍य हे पत्नीविना पूर्ण होत नाही. अनेक व्रते आहेत की, जी पुरुषही करतात. ही सारी व्रते कुटुंबाच्‍या लाभासाठीच असतात, म्‍हणजे असे आपल्‍याला कुठेही म्‍हणता येत नाही की, व्रतवैकल्‍ये ही केवळ स्‍त्रियांनाच सांगितलेली आहेत. स्‍त्री आणि पुरुष दोघेही कुटुंबासाठी व्रते करत असतात; कारण भारतीय संस्‍कृती हे दुसर्‍याचा विचार करण्‍याचा संदेश देते.

३. स्‍त्रियांच्‍या गुलामीचा नव्‍हे, तर गौरवाचा सण !

जर आपण वटसावित्री कथेचा आधार घेतला, तर सावित्री ही अश्‍वपती नावाच्‍या मोठ्या राजाची कन्‍या आहे. ती अतिशय हुशार, शस्‍त्र आणि शास्‍त्र पारंगत आहे. तिने अतिशय विचारपूर्वक सत्‍यवानाशी विवाह केलेला आहे. ती प्रत्‍यक्ष यमाशी वाद घालते आणि जिंकते. यातूनच तिची प्रखर बुद्धीमत्ता आपल्‍या लक्षात येते. या कथेतून आपल्‍याला सावित्रीचे अनेक गुण दिसतात. तिचा स्‍वतःवर असलेला विश्‍वास दिसतो; कारण तिला लग्‍नाच्‍या आधीच ठाऊक होते की, सत्‍यवानाचे आयुष्‍य अधिक नाही; पण ती अतिशय विश्‍वासाने त्‍याच्‍याशी विवाह करून त्‍याला नुसते जीवनदानच देत नाही, तर त्‍याचे गेलेले राज्‍य परत मिळवते. यातून तिचा स्‍वतःवरचा विश्‍वास आणि स्‍वप्‍नपूर्तीचा ध्‍यास दिसतो. ती आपल्‍या अंध सासू-सासर्‍यांची सेवा करते. यातून तिचा विनम्रपणा दिसतो. याखेरीज अतिशय कठीण परिस्‍थितीत ती आपल्‍या पतीला साथ देते. यातून तिचा समर्पित भावही लक्षात येतो. थोडक्‍यात कथेचे सार असे आहे की, सावित्री एक अतिशय हुशार आणि कर्तृत्‍ववान राजकन्‍या आहे. ती कुणीतरी अशिक्षित किंवा अजाण अशी स्‍त्री नव्‍हे. तिने विचारपूर्वक निर्णय घेतला आणि त्‍यात ती यशस्‍वी झाली आहे. त्‍यामुळे हा सण स्‍त्रियांच्‍या गुलामीचा नव्‍हे, तर भारतीय स्‍त्री ही किती विचारी असते आणि ती सर्व कर्तव्‍य निभावून कशी यशस्‍वी होते, हे दाखवणारा सण आहे. हा सण स्‍त्रियांच्‍या गौरवाचा सण आहे.

४. विरोधकांनी हिंदु मुलींच्‍या हत्‍यांविषयी बोलावे !

जर स्‍त्री सन्‍मान खरच करायचा असेल, तर वटपौर्णिमेला जे विरोध करणार्‍यांनी त्‍याला पाठिंबा द्यायला हवा. जर त्‍यांना स्‍त्रियांचा अपमानच शोधायचा असेल, तर लव्‍ह जिहादच्‍या प्रकरणी प्रतिदिन होणार्‍या मुली आणि महिला यांची फसवणूक आणि हत्‍या यांविषयी बोलायला हवे ! आपला प्रत्‍येक सण आपण अतिशय मनापासून साजरा करणे, हेच या नकली सुधारकांना योग्‍य उत्तर असेल !

– कु. अन्‍नदा विनायक मराठे, दापोली, रत्नागिरी (३१.५.२०२३)