पाकिस्तानमध्ये निःशुल्क शिधावाटपाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जण ठार

कराची – येथे रमझानच्या निमित्ताने सरकारकडून गरिबांना अन्नधान्य वाटप केले जात होते. त्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जण ठार झाले. ही घटना एका कारखान्याच्या आवारात घडली. मृतांमध्ये ८ महिला आणि ३ लहान मुले यांचा समावेश आहे. त्या वेळी पोलीसही घटनास्थळी उपस्थित होते; मात्र गोंधळ उडाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून पळ काढला.

१. कारखान्यात निःशुल्क धान्य घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. धान्याचे प्रमाण अल्प, तर गर्दीचे प्रमाण अधिक होते.

२. धान्य मिळण्यासाठी जमावामध्ये प्रथम बाचाबाची आणि त्यानंतर हाणामारी झाली. चेंगराचेंगरी झाल्यावर थोड्याच वेळात विजेची तार तुटून लोकांवर पडली. विजेच्या धक्क्यानेही काही लोकांचा मृत्यू झाला.

३. यापूर्वीही पंजाब प्रांतात निःशुल्क पीठ मिळण्यासाठी साहिवाल, बहावलपूर, मुझफ्फरगड आणि ओकारा या जिल्ह्यांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जण ठार झाले होते.