विद्यार्थी-साधकांनो, उन्हाळ्याच्या सुटीत चैतन्यदायी आश्रमजीवन अनुभवा आणि साधनेचे बीज अंतरात रोवून हिंदु राष्ट्रासाठी पात्र व्हा !

सर्वत्रच्या विद्यार्थी-साधकांना सनातनच्या आश्रमांत रहाण्याची अमूल्य संधी !

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. भावी पिढीवर साधनेचा संस्कार करण्यासाठी साधक-पालकांनी सुटीत आपल्या पाल्यांना सनातनच्या आश्रमांत पाठवावे !

साधक-पालकांनो, आपले पाल्य म्हणजे हिंदु राष्ट्राची भावी पिढी ! या पिढीवर सुसंस्कार करणे आणि त्यांच्या मनावर साधनेचे बीज रुजवणे आवश्यक आहे. पुढील पिढीला आतापासून घडवल्यास ही मुले हिंदु राष्ट्रातील सुजाण नागरिक बनतील ! थोड्याच दिवसांत शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुटी लागेल. या काळात विद्यार्थी-साधकांना रामनाथी आणि देवद येथील आश्रमांत, तसेच मंगळुरू सेवाकेंद्रात राहून आश्रमजीवन अनुभवण्याची सुसंधी आहे. साधक-पालक १३ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या आपल्या पाल्यांना जवळच्या आश्रमांत पाठवू शकतात. आश्रमातील विविध प्रकारच्या सेवांमध्ये साहाय्य केल्याने त्यांना अनेक गोष्टी शिकता येतील, तसेच त्यांच्यात व्यष्टी आणि समष्टी साधनेची आवड निर्माण होईल.

२. आश्रमांत उपलब्ध असलेल्या सेवा

२ अ. सनातन-निर्मित ग्रंथांच्या संदर्भातील सेवा : मराठी भाषेत टंकलेखन करणे, लिखाणाचे भाषांतर आणि भाषाशुद्धी करणे, ग्रंथसंरचना करणे, ग्रंथांसाठीची मुखपृष्ठे बनवण्यासाठी संगणकीय छायाचित्रांवर काम करणे, रेखाचित्रे (आऊटलाईन्स्) सिद्ध करणे, सात्त्विक कलाकृती सिद्ध करणे

२ आ. नियतकालिकांच्या संदर्भातील सेवा : वृत्तांचे संकलन करणे, विज्ञापनांची (जाहिरातींची) संरचना करणे

२ इ. ध्वनीचित्रीकरणाच्या संदर्भातील : चित्रीकरण करणे, छायाचित्रे काढणे, ध्वनीमुद्रण (रेकॉर्डिंग) करणे, चित्रीकरणाचे संकलन करणे आणि इंग्रजी भाषेत टंकलेखन करणे

२ ई. अमूल्य वस्तू जतन करण्याच्या संदर्भातील : भारतभरातील वैशिष्ट्यपूर्ण वस्तू, तसेच संतांनी वापरलेल्या वस्तू जतन करण्यासाठी उन्हात ठेवून वाळवणे, या वस्तूंच्या नोंदी आणि बांधणी (पॅकिंग) करणे, तसेच स्कॅनिंग करणे

या समवेत संगणक-दुरुस्ती, ग्रंथालय, स्वयंपाक, बांधकाम, व्यवस्थापन, संकेतस्थळ इत्यादींशी संबंधित सेवाही उपलब्ध आहेत.

विद्यार्थी-साधकांची प्रकृती, आवड, कौशल्य, सेवा शिकण्याची क्षमता आणि घरी गेल्यानंतर ते सेवेसाठी देऊ शकणारा वेळ या घटकांचा विचार करून त्यांना सेवा शिकवण्यात येतील. या सेवा शिकण्यासाठी त्यांना जेवढे दिवस आश्रमात रहाणे शक्य आहे, तेवढे दिवस ते राहू शकतात.

वरील सेवांत साहाय्य करून धर्मकार्यात खारीचा वाटा उचलण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थी-साधकांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून आश्रमसेवकांशी संपर्क साधावा.

अन्य महत्त्वाच्या सूचना

१. ‘आश्रमात राहून विद्यार्थी-साधकांच्या वाईट सवयी, त्यांचे समष्टीच्या दृष्टीने हानीकारक असे स्वभावदोष न्यून होऊन त्यांच्यात साधकत्व निर्माण होईल’, या विचाराने पालकांनी साधना आणि सेवा करण्यास इच्छुक नसणार्‍या पाल्यांना आश्रमात पाठवू नये.

२. आश्रमात येण्याच्या संदर्भात आश्रमातून निश्चित कळवल्यानंतरच आरक्षण करावे. आश्रमात येण्यासाठी वाहनाचे आरक्षण करतांना त्याच वेळी परतीचे आरक्षणही करावे, अन्यथा आयत्या वेळी तिकिटे मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

३. आश्रमात रहाण्यासाठी येतांना विद्यार्थी-साधकांनी स्वतःचे अंथरुण आणि पांघरुण, तसेच ते घेत असलेली औषधे समवेत आणावीत.

जिल्हासेवकांनो, विद्यार्थी-साधकांना आश्रमात पाठवण्यापूर्वी पुढील सूत्रे लक्षात घ्या !

जिल्हासेवकांनी विद्यार्थी-साधकांची निवड करतांना ते आश्रमजीवनाचा, सेवांसंबंधी मिळालेल्या प्रशिक्षणाचा लाभ करून घेऊन सेवेसाठी वेळ देऊ शकतील, अशांचेच नियोजन करावे. विद्यार्थी-साधक जिल्ह्यातून आश्रमात येण्याचे निश्चित झाल्यावर अन्य माहितीसह त्यांचे स्वभावदोष आणि गुणही कळवावेत, जेणेकरून ‘स्वभावदोषांवर मात कशी करावी’, याविषयी दिशादर्शन करून त्यांना साधनेत साहाय्य करता येईल.