शिवछत्रपतींच्या रायगड जिल्ह्यातील असंरक्षित गडांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष !

सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने गडांच्या संवर्धनासाठी योगदान देण्याचे आवाहन !

रत्नागिरी – रायगड जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांत अद्भुत असे गडकोट वसलेले आहेत. स्थलदुर्ग, जलदुर्ग आणि गिरिदुर्ग या प्रकारातील गड इथे आहेत. यांतील काही गडांची हे पुरातत्व विभागाच्या संरक्षित स्मारकात नोंदही नाही. असे गड वन विभागाच्या अंतर्गत येत असून यावर पुरेसे डागडुजीचे कार्य होत नाही. येथे पर्यटन सुविधा नसल्याने या ठिकाणी स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत नाही. महाराष्ट्र शासनाने या गडांकडे लक्ष देऊन पुरेसा निधी संबंधित विभागाला उपलब्ध करून या गडांच्या संवर्धनाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी सह्याद्री प्रतिष्ठान या संघटनेच्या दुर्गसेविका सौ. संध्या दळवी यांनी केली आहे.

सह्याद्री प्रतिष्ठान ही गेली १४ वर्षे महाराष्ट्रातील गड-दुर्ग संवर्धनाचे कार्य करत आहे. या संस्थेने विविध गडांवर स्वखर्च आणि लोकवर्गणी यातून संवर्धनाचे पुढील काम केले आहे. रायगड जिल्ह्यातील सरसगड आणि कर्नाळा येथे प्रवेशद्वारे लावण्यात आली. जंजिरा गडावर कायमस्वरूपी तिरंगा ध्वज, पद्मदुर्गावर तोफांसाठी तोफगाडे आणि भगवा ध्वज लावण्यात आला आहे. कुलाबा गड, कोरलाई गड, उंदेरी गड, कोथळी गड, द्रोणागिरी या गडांवर तोफगाडे बसवण्यात आले. पेण येथील रत्नदुर्ग गडावर महादेव मंदिराचा जीर्णाेद्धार करण्यात आला आहे.
‘लोकसहभागातून दुर्गसंवर्धनाच्या कार्यासाठी रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी या कार्यात सहभागी व्हावे’, असे आवाहन दुर्गसेविका सौ. नीलम जाधव यांनी केले आहे.