श्रीगोंदा (नगर) येथील दूध भेसळ प्रकरणाची व्‍याप्‍ती पुणे आणि सोलापूर जिल्‍ह्यांपर्यंत !

श्रीगोंदा (जिल्‍हा नगर) – तालुक्‍यातील काष्‍टी येथील दूध भेसळ प्रकरणाची व्‍याप्‍ती पुणे, सोलापूर, नगर जिल्‍ह्यांपर्यंत पोचली आहे. मुख्‍य वितरक संदीप मखरे याची न्‍यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी वाढवली आहे. भेसळ प्रकरणात ५ नावे पुढे आली असून त्‍यातील ४ जण कारवाईच्‍या भीतीने पसार झाल्‍याची चर्चा आहे. राहुरीतून समीर शेख यास कह्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पोलीस कोठडीतील या प्रकरणाशी संबंधित आरोपींना घरचे डबे, जेवण, फळे देण्‍यात येत आहेत; मात्र इतर आरोपींना त्‍यासाठी मज्‍जाव केला जात आहे. तरी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दूध भेसळ प्रकरणाची पाळेमुळे संपुष्‍टात आणावीत, अशा प्रतिक्रिया व्‍यक्‍त होत आहे.

पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग म्‍हणाले, ‘‘सध्‍या तरी पुणे, सोलापूर, नगर जिल्‍ह्यांपर्यंत याचे लोण पसरले आहे. या प्रकरणातील मुख्‍य आरोपी काष्‍टी येथील बाळासाहेब पाचपुते असून आम्‍ही त्‍याला पकडण्‍याचे प्रयत्न करत आहोत.’’

संपादकीय भूमिका

  • दुधात होणारी भेसळ हा आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने अतिसंवेदनशील विषय असल्‍याने सरकार याकडे गांभीर्याने पाहील का ?
  • अन्‍न आणि औषध प्रशासन काही कृती करते कि नाही ? असा विचार कुणाच्‍या मनात आल्‍यास चूक ते काय ? दुधामधील भेसळ होऊच नये, यासाठी उपाय काढणारे प्रशासन हवे !