भाजपचे अधिवक्‍ता उमेश पाल यांची हत्‍या आणि राजकारणातील गुन्‍हेगारी !

राजकारणात वाढत असलेली गुन्‍हेगारी रोखण्‍यासाठी समाजाभिमुख हिंदु राष्‍ट्र हवे !

१. आमदारकीच्‍या निवडणुकीत समाजवादी पक्षाच्‍या अतिक अहमदच्‍या भावाचा पराभव करणार्‍या राजू पाल यांची हत्‍या

‘समाजवादी पक्षाचा नेता अतिक अहमद पूर्वी पश्‍चिम प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे आमदार होता. वर्ष २००४ मध्‍ये तो खासदार झाला. त्‍यानंतर त्‍याची पश्‍चिम प्रयागराज येथील आमदारकीची परंपरागत जागा रिकामी झाली. तेथे पोटनिवडणुकीत अतिकने त्‍याचा भाऊ अशरफला उभे केले. त्‍याच्‍या विरोधात राजू पाल यांनी बहुजन समाज पक्षाच्‍या तिकिटावर निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्‍यांनी अशरफचा पराभव केला. तेथून अतिक अहमद आणि राजू पाल यांच्‍यात संघर्ष चालू झाला. काही मासांनी, म्‍हणजे २५ जानेवारी २००५ या दिवशी राजू पाल यांची १९ गोळ्‍या घालून हत्‍या करण्‍यात आली. यात त्‍यांच्‍या सहकार्‍यांचाही मृत्‍यू झाला. पोलिसांमध्‍ये अतिक अहमदची एवढी दहशत होती की, राजू पाल यांच्‍या अंत्‍यसंस्‍काराच्‍या वेळी राजू पालच्‍या आई राणी पाल आणि पत्नी पूजा पाल यांच्‍यासह कुणालाही उपस्‍थित राहू दिले नाही.

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

या हत्‍याकांडातील सर्व साक्षीदारांना फोडण्‍यात आले; पण पूजा पाल अतिकच्‍या विरोधात निवडणुका आणि न्‍यायालयालयीन लढा यांच्‍या पातळीवर लढत राहिली. त्‍यानंतर त्‍या मतदारसंघातून पूजा पाल २ वेळा आमदार झाल्‍या. या प्रकरणाचे अन्‍वेषण केंद्रीय अन्‍वेषण यंत्रणेकडे (सीबीआयकडे) देण्‍याविषयीची लढाई मात्र ती उत्तरप्रदेश उच्‍च न्‍यायालयात हरली. या निर्णयाच्‍या विरोधात ती सर्वोच्‍च न्‍यायालयात गेली. वर्ष २०१९ मध्‍ये सर्वोच्‍च न्‍यायालयाने ‘या प्रकरणाचे अन्‍वेषण ‘सीबीआय’ने करावे’, असा आदेश दिला. राजू पाल हत्‍याकांड प्रकरणी स्‍थानिक पोलिसांनी सर्वप्रथम ९ जणांविरुद्ध आरोपपत्र प्रविष्‍ट केले. यात अतिक अहमद, त्‍यांचा भाऊ आणि अन्‍य गुंड यांचाही समावेश होता.

२. कुख्‍यात गुंड अतिक अहमदचा गुन्‍हेगारी इतिहास

कुख्‍यात गुंड अतिक अहमद याने वयाच्‍या १७ व्‍या वर्षी एका व्‍यक्‍तीची हत्‍या केली. तेव्‍हा त्‍याची निर्दोष सुटका झाली होती. त्‍यानंतर त्‍याने वर्ष १९८९ मध्‍ये आमदारकीसाठी अपक्ष निवडणूक लढवली. त्‍याच्‍या विरोधात तत्‍कालीन कुख्‍यात गुंड चांद बाबा याने निवडणूक लढवली. या निवडणुकीत चांद बाबाचा पराभव होऊन अतिक अहमद निवडून आला. पुढे काही दिवसांमध्‍ये चांद बाबाला ठार मारण्‍यात आले. तेथून अतिक अहमदची दहशत प्रचंड वाढली. अतिकच्‍या गुंडांनी लोकांच्‍या विशेषत: हिंदूंच्‍या मालमत्ता मातीमोल किंमतीत स्‍वत:च्‍या नावावर करून घेणे चालू ठेवले.

तीन वेळा अपक्ष आमदार झाल्‍यावर तो समाजवादी पक्षाच्‍या तिकिटावर चौथ्‍यांदा आमदारपदी निवडून आला. त्‍यानंतर वर्ष २००४ मध्‍ये तो फुलपूर येथून खासदार बनला. त्‍यामुळे त्‍याची प्रयागराज येथील आमदारकीची परंपरागत जागा रिकामी झाली. तेथे त्‍याने त्‍याचा भाऊ अशरफला उभे केले. त्‍याचा बसपचे नेते राजू पाल यांनी पराभव केला. त्‍यानंतर काही मासानंतर पाल यांची निर्घृण हत्‍या झाली. अतिक अहमद सध्‍या गुजरातच्‍या साबरमती कारागृहात आहे. राजू पाल हत्‍याकांड प्रकरणात भाजपचे अधिवक्‍ता उमेश पाल प्रत्‍यक्ष साक्षीदार होते. पुढे या हत्‍याकांडाचे अन्‍वेषण ‘सीबीआय’ने करावे, असा आदेश सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिला, तसेच उत्तरप्रदेशमध्‍ये परत एकदा भाजपची सत्ता आली. त्‍यामुळे अतिक अहमदचे धाबे दणाणले आहे.

३. राजू पाल हत्‍याकांडातील साक्षीदार अधिवक्‍ता उमेश पाल यांची हत्‍या

राजू पाल हत्‍याकांडातील अधिवक्‍ता उमेश पाल हे मुख्‍य साक्षीदार होते. त्‍यांनी ही घटना प्रत्‍यक्ष पाहिली होती. या प्रकरणातील सर्व साक्षीदार फितूर झाले होते; परंतु अधिवक्‍ता उमेश पाल कधीही अतिक अहमदच्‍या गुंडांच्‍या धमक्‍यांना बळी पडले नाहीत.  ते नेहमीच त्‍यांच्‍या भूमिकेवर ठाम राहिले. उमेश पाल यांची साक्ष होणार होती. अधिवक्‍ता उमेश पाल यांनी साक्ष देऊ नये, यासाठी अतिक अहमद याने कर्णावती येथून धमकीवजा दूरभाष केला होता. या धमकीला न घाबरता अधिवक्‍ता उमेश पाल साक्ष देण्‍यावर ठाम होते. २४.२.२०२३ या दिवशी अधिवक्‍ता उमेश पाल न्‍यायालयातून घरी परतत असतांना त्‍यांच्‍यावर जीवघेणे आक्रमण करण्‍यात आले. यात त्‍यांचा मृत्‍यू झाला. या हत्‍याकांडाचा कट ‘मुस्‍लीम विधी महाविद्यालयात’ शिजला. घटनास्‍थळी गुड्डू मुस्‍लिम या धर्मांधाने देशी बाँब फोडले. त्‍यामुळे तेथे प्रचंड धूर निर्माण झाला होता. त्‍याच वेळी अधिवक्‍ता उमेश पाल यांच्‍यावर जवळून गोळ्‍या झाडण्‍यात आल्‍या. त्‍यांनी जीव वाचवण्‍याचा प्रयत्न केला. या वेळी तेथे एका दुकानात थांबलेल्‍या मारेकर्‍याने अधिवक्‍ता उमेश पाल यांच्‍यावर गोळीबार केला.

या प्रकरणात अनेक धक्‍कादायक गोष्‍टी पुढे आल्‍या आहेत. उस्‍मान चौधरी हा चालक म्‍हणून अतिककडे कामाला होता. तो मूळचा विजय चौधरी आहे. पूर्वी त्‍याचे धर्मांतर करण्‍यात आल्‍याचे समजते. या वेळी पत्रकार आणि इतरांनी सांगितले की, धर्मांधांनी लव्‍ह जिहाद, थूंक जिहाद, दांडिया जिहाद आणि आता ‘शूटर’ जिहाद चालू केला आहे. यात हिंदूंचे धर्मांतर करून त्‍यांच्‍या माध्‍यमातून जिहाद करण्‍यात येत आहे. पोलिसांसमोर हे एक नवीन संकट उपस्‍थित झाले आहे. यापूर्वी वर्ष २००५ मध्‍ये राजू पाल यांच्‍यावर अतिक अहमदच्‍या गुंडांनी आक्रमण केले होते, तेव्‍हाही पाल यांच्‍या सुरक्षेत सशस्‍त्र पोलीस होते.  त्‍यांचीही हत्‍या करण्‍यात आली होती.

४. गुंड अतिक अहमदच्‍या विरोधात उत्तरप्रदेश सरकार आणि पोलीस यांची धडक मोहीम

या संदर्भात नुकतीच एक बातमी आली की, उत्तरप्रदेश सरकारने बुलडोझर चालवून अतिक अहमदच्‍या अवैध संपत्ती जमीनदोस्‍त केल्‍या. या मोहिमेच्‍या आड येणार्‍या एका ‘एशियन न्‍यूज इंटरनॅशनल’ (ए.एन्.आय.) या वृत्तसंस्‍थेच्‍या पत्रकाराच्‍या घरावरही सरकारने बुलडोझर चालवला. ‘उत्तरप्रदेशमध्‍ये कायदा आणि राज्‍यघटना यांचे उल्लंघन होत असून निरपराध लोकांची घरे पाडली जात आहेत. त्‍यामुळे अतिक अहमदची संपत्ती बुलडोझरने पाडू नये किंवा त्‍याची हानी करू नये. तसेच त्‍याची चौकशी व्‍हावी’, अशी या पत्रकाराने मागणी केली होती.

अधिवक्‍ता उमेश पाल हत्‍याकांडातील आरोपींना पकडण्‍यासाठी उत्तरप्रदेश पोलिसांचे विशेष कृती दल आणि प्रयागराज पोलीस यांचे विविध चमू प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी यातील आरोपी अरबाज आणि उस्‍मान यांना चकमकीत ठार केले आहे.

उमेश पाल हत्‍याकांडात अन्‍य आरोपींसह अतिकचा तिसरा मुलगा असदचेही नाव घालण्‍यात आले. (मूळ प्रथमदर्शनी माहिती अहवालात त्‍याचे नाव नव्‍हते.) पोलिसांच्‍या मते अन्‍वेषणात जी नावे पुढे येतील, त्‍यांना आरोपी करण्‍यात येईल. भारतीय दंड विधान ३०२, ३०७, १४७, १४८, १४९ आणि विस्‍फोटक अधिनियम कायदा ३ आणि ‘क्रिमिनल लॉयरमेंट’ कलम ७ या सूत्रांखाली गुुन्‍हे नोंदवण्‍यात आले आहेत.

५. राजस्‍थानमध्‍येही अधिवक्‍त्‍याची हत्‍या

ज्‍याप्रमाणे आमदार राजू पालच्‍या हत्‍याकांडातील साक्षीदार अधिवक्‍ता उमेश पाल यांची हत्‍या झाली, त्‍याच पद्धतीची राजस्‍थान उच्‍च न्‍यायालयात कार्यरत असणार्‍या एका अधिवक्‍त्‍याचीही हत्‍या झाली आहे. वर्ष २०२० मध्‍ये एक जनहित याचिका प्रविष्‍ट करण्‍यात आली होती. त्‍यात त्‍यांनी अधिवक्‍त्‍यांचे रक्षण होण्‍यासाठी कायदा करण्‍याची मागणी केली होती. या प्रकरणी नुकतीच सुनावणी झाली. त्‍यात केंद्र सरकार, राजस्‍थान सरकार आणि बार कौन्‍सिल ऑफ इंडिया, राजस्‍थान यांना कारणे दाखवा नोटीस काढण्‍यात आली.’

श्रीकृष्‍णार्पणमस्‍तु !

– (पू.) अधिवक्‍ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्‍च न्‍यायालय (९.३.२०२३)