‘लव्‍ह जिहाद’च्‍या वाढत्‍या घटनांना आळा घालण्‍यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या काळाप्रमाणे कठोर शिक्षा आवश्‍यक ! – विक्रम पावसकर, हिंदु एकता आंदोलन

विटा (जिल्‍हा सांगली) येथील ‘हिंदु जनगर्जना मोर्च्‍या’त १० सहस्रांहून अधिक हिंदूंचा सहभाग !

हिंदु जनगर्जना मोर्चासाठी उपस्‍थित हिंदू

विटा (जिल्‍हा सांगली), २४ जानेवारी (वार्ता.) – देशात आणि राज्‍यात सर्वत्र ‘लव्‍ह जिहाद’च्‍या घटना वाढत आहेत. अशा घटनांना आळा घालण्‍यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्‍याप्रमाणे बलात्‍कार करणार्‍यांना चौरंगा करण्‍याची शिक्षा दिली, तशाच कठोर शिक्षेची आता आवश्‍यकता आहे. विट्यातील ‘लव्‍ह जिहाद्यां’चे अड्डे असणार्‍या व्‍यायामशाळा, तसेच  नृत्‍यशाळा बंद कराव्‍या लागतील. हिंदूंनी पठाण चित्रपटाला कडाडून विरोध करावा, असे आवाहन हिंदू एकता आंदोलनाचे सातारा जिल्‍हाध्‍यक्ष श्री. विक्रम पावसकर यांनी केले. ते विटा येथील हिंदु जनगर्जना मोर्च्‍यात बोलत होते. या मोर्च्‍यात १० सहस्रांपेक्षा अधिक धर्माभिमानी हिंदु उपस्‍थित होते.

हिंदु जनगर्जना मोर्चासाठी उपस्‍थित हिंदूंना मार्गदर्शन करतांना श्री. विक्रम पावसकर

१. मोर्च्‍याच्‍या प्रारंभी हिंदु राष्‍ट्र सेनेचे संस्‍थापक श्री. धनंजय देसाई यांच्‍या हस्‍ते ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात भगव्‍या ध्‍वजाचे पूजन करण्‍यात आले. श्री भैरवनाथ मंदिर येथून मोर्च्‍यास प्रारंभ झाला. तेथून छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोर्चा आला. श्री चौंडेश्‍वरी मंदिरासमोर मोर्च्‍याचे सभेत रूपांतर झाले.

२. प्रारंभी हिंदु भगिनी सौ. धनश्री शिंदे आणि सौ. मेघाताई कदम यांनी ‘लव्‍ह जिहाद’, ‘गोहत्‍या’ आणि ‘धर्मांतर’ या ज्‍वलंत विषयांवर उपस्‍थितांना जागृत केले. ध्‍येयमंत्र म्‍हणून मोर्च्‍याची सांगता झाली.

३. या मोर्च्‍यासाठी भाजपचे खासदार संजय पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्‍हा परिषदेचे माजी उपाध्‍यक्ष सुहास बाबर, माजी नगराध्‍यक्ष वैभव पाटील यांच्‍यासह विविध सामाजिक संघटना, ज्ञाती संघटना, हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना, राजकीय संघटना आणि व्‍यापारी संघटना यांसमवेत तालुक्‍यातील प्रमुख राजकीय नेतेही उपस्‍थित होते.

विशेष

१. संपूर्ण तालुक्‍यात बंद पाळून हिंदू रस्‍त्‍यावर उतरले.

२. आमदार गोपीचंद पडळकर हे मोर्च्‍यानंतर सांगता सभेत कार्यकर्त्‍यांसमवेत भारतीय बैठक घालून बसल्‍याचा उल्लेख श्री. धनंजय देसाई यांनी आपल्‍या भाषणात केला.

३. व्‍यापारी संघटनेने मोर्च्‍याला पाठिंबा देऊन पोलिसांना निवेदन दिले, तसेच शहर बंद ठेवून मोर्च्‍यात सहभागी झाले.

वर्ष २०२४ च्‍या निवडणुकीत धर्महित जपणार्‍यालाच मतदान ! – धनंजय देसाई

हिंदु जनगर्जना मोर्चासाठी उपस्‍थित हिंदूंना मार्गदर्शन करतांना श्री. धनंजय देसाई

हिंदु राष्‍ट्र सेनेचे संस्‍थापक धनंजय देसाई म्‍हणाले, ‘‘लव्‍ह जिहाद’, धर्मांतर, गोहत्‍या यांविरोधात कायदे झालेच पाहिजेत. मशिदींवरील अवैध भोंगे उतरवलेच पाहिजेत. धर्माधिष्‍ठित हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना ही आपली प्रमुख मागणी असून ‘२०२४ च्‍या निवडणुकीत जो धर्महित जपेल, त्‍यालाच मतदान’, ही आपली प्रमुख भूमिका आहे. हिंदु राष्‍ट्र हा आपला जन्‍मसिद्ध अधिकार आहे आणि तो आपण मिळवायचाच आहे. या सर्व मागण्‍यांसमवेत ‘वक्‍फ बोर्ड’ बंद झाले पाहिजे.’’