विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हादई प्रश्नावरून विरोधकांचा सभात्याग

विरोधकांना विधानसभेत म्हादईच्या प्रश्नावरून शासनाची भूमिका स्पष्ट करण्याच्या मागणीवरून विधानसभेत गोंधळ घातल्याने त्यांना सभागृहाबाहेर काढण्यात आले

पणजी, १६ जानेवारी (वार्ता.) – विधाससभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणाच्या प्रारंभीच राज्यपालांनी विधानसभेत म्हादईच्या प्रश्नावरून शासनाची भूमिका स्पष्ट करण्याच्या मागणीवरून विधानसभेत गोंधळ घातल्याने त्यांना सभागृहाबाहेर काढण्यात आले.

 (सौजन्य : Goan varta live)

विधानसभेत राज्यपालांनी त्यांच्या अभिभाषणाला प्रारंभ करताच विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी हस्तक्षेप करत ‘आधी म्हादई प्रश्नावर सरकारची भूमिका राज्यपालांनी स्पष्ट करावी, तसेच सविस्तर प्रकल्प अहवालासंबंधी काय झाले ? हा अहवाल मागे घेतला का ?’, असे प्रश्न उपस्थित करत राज्यपालांचे अभिभाषण थांबवले. त्यानंतर सभापतींनी गदारोळाला न जुमानता राज्यपालांना अभिभाषण चालू ठेवण्याची विनंती केली. नंतर थोड्याच वेळात विरोधी पक्षाचे आमदार हातात फलक घेऊन ‘आमची म्हादय, आमका जाय’ (आमची म्हादई आम्हाला पाहिजे), अशी घोषणा देत सभापतींच्या समोरील जागेत एकत्र आले. या सर्वांनी काळ्या रंगाची वेशभूषा केली होती. सभापतींनी विरोधकांना समजावण्याचा प्रयत्न केला, तरीही विरोधकांनी घोषणा देणे चालूच ठेवल्यानंतर सभापतींनी घोषणा देणार्‍यांना सभागृहाबाहेर काढण्यासाठी ‘मार्शल’ना (विधानसभेतील सुरक्षारक्षकांना) पाचारण केले. नंतर विरोधी पक्षाचे आमदार सभात्याग करून बाहेर गेले.

‘म्हादई जलवाटप तंटा’ या संदर्भातील आजपर्यंतच्या घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा