थेट सरपंचपदांसह १ सहस्र १६६ ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला मतदान  !

  • नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदान 

  • १४ ऑक्टोबर या दिवशी मतमोजणी

मुंबई – विविध १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ सहस्र १६६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर २०२२ या दिवशी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी ७ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू झाली असून १४ ऑक्टोबर २०२२ या दिवशी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस्. मदान यांनी ७ सप्टेंबर या दिवशी येथे केली.

मदान म्हणाले की, संबंधित तहसीलदार १३ सप्टेंबर या दिवशी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र २१ ते २७ सप्टेंबर या कालावधीत प्रविष्ट करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी २८ सप्टेंबर या दिवशी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान १३ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल.

नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी १४ ऑक्टोबर या दिवशी होईल. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत.