भायखळा (मुंबई) येथे मुसलमानबहुल भागातील हिंदु कुटुंबाचा धर्मांधांकडून छळ !

  • सेवानिवृत्त झाल्यामुळे महानगरपालिकेचे घर सोडण्यासाठी दबाव !

  • हिंदु कुटुंबाच्या घरासमोर खराब पाणी टाकणे, बकर्‍या कापणे आदी प्रकार केल्याचा आरोप

  • धर्मांधांनी हिंदु कुटुंबाला बेघर केल्याचा आरोप !

मुंबई – भायखळा येथे मुसलमानबहुल भागात रहाणार्‍या हिंदु कुटुंबाने तेथून घर सोडून निघून जावे, यासाठी धर्मांधांनी त्यांचा छळ करून त्यांना बेघर केले. या कुटुंबासाठी रस्त्यावर उतरून शांततेने आंदोलन करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना सर जे.जे. मार्ग पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी कह्यात घेऊन आंदोलन करण्यास प्रतिबंध केला.

१. वर्ष १९४२ पासून दीपक जोगडिया आणि पुढे त्यांच्या तीन पिढ्यांतील सदस्य मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागात कामाला होते. आता ते सर्व जण सेवानिवृत्त झाले आहेत. तथापि मागील ८० वर्षांपासून अद्यापपर्यंत जोगडिया कुटुंब मुसलमानबहुल भागातील महानगरपालिकेच्या घरात रहात होते.

२. मागील २ वर्षांपासून तेथील धर्मांधांनी सारिका जोगडिया (दीपक यांची मुलगी) यांच्या कुटुंबाला वारंवार घर रिकामे करण्याची धमकी दिली होती; मात्र सरकारने आजोबांना हे घर रहाण्यासाठी दिल्याचे सांगत सारिका यांनी घर सोडून जाण्यास नकार दिला.

३. त्यानंतर धर्मांधांनी त्यांच्या घरासमोर खराब पाणी टाकणे, बकर्‍या कापणे, मोठ्या आवाजामध्ये ध्वनीवर्धक लावणे, तसेच भजन लावण्यास मज्जाव करणे, असे त्रास देण्यास प्रारंभ केला.

४. या विरोधात सारिका यांनी सर जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर पोलिसांनी  या प्रकरणी नदीम मल्लिक नावाच्या व्यक्तीला समज देऊन सोडून दिले. तेव्हापासून ही तक्रार मागे घेण्यासाठी तिच्यावर दबाव आणला जात आहे.

५. या वेळी धर्मांधांनी ‘अमिन पटेल हे आमचे नेते असून ते आमच्या मोठ्या प्रमाणात असलेल्या मतांमुळे तुला घर खाली करायला लावतील’, अशी धमकी सारिका जोगडिया यांना दिली. त्यानुसार ‘पटेल यांनी पोलीस आणि मुंबई महानगरपालिका प्रशासन यांना हाताशी धरून आमच्या कुटुंबाला घराच्या बाहेर काढले आहे’, असा आरोप सारिका यांनी केला आहे.

६. या प्रकरणी सारिका यांनी सामाजिक प्रसारमाध्यमांतून व्हिडिओ प्रसारित करून त्यात ‘मी हिंदु असल्याची मला शिक्षा मिळत आहे, मला बेघर करण्यात आले आहे’, असे सांगून साहाय्यासाठी आवाहन केले आहे. त्यामुळे ३० जुलै या दिवशी काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तेथे आंदोलन केले. या वेळी स्थानिक पोलिसांनी आंदोलकांना कह्यात घेऊन समज देऊन सोडून दिले.

सेवानिवृत्तीनंतर घर रिकामे करण्यास सांगितल्यानुसार महानगरपालिकेची  कार्यवाही ! – पोलीस

या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष बोराडे म्हणाले, ‘‘महानगरपालिकेने जोगडिया कुटुंबाला सेवानिवृत्तीनंतर हे घर रिकामे करण्यास सांगितले होते. त्यानुसार महानगरपालिकेने कार्यवाही केली आहे. या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.’’

महानगरपालिकेकडून नियमानुसारच कारवाई ! – मुंबई महानगरपालिकेतील एक अधिकारी

या प्रकरणी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित विभागातील अधिकार्‍यांना याविषयी विचारले असता नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी सांगितले, ‘‘ही जागा महानगरपालिकेचीच आहे. भाडेकरू कोण असावेत ? याविषयी सर्व चौकशी करूनच महानगरपालिकेकडून योग्य ती कारवाई करण्यात आली आहे. कारवाईला प्रमुख अधिकार्‍यांची अनुमती मिळाली आहे. महानगरपालिकेकडून नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. १ ऑगस्ट या दिवशी याविषयी महानगरपालिकेचे अधिकारी आणि जोगाडिया कुटुंबीय यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्यात आली आहे.’’

घटनेविषयी मान्यवरांच्या प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून हिंदु कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा ! – रूकेश गिरोला, सरचिटणीस, बेस्ट, मनसे

मुंबईमध्ये महानगरपालिकेचा ‘बी’ प्रभाग हा सगळ्यात भ्रष्ट आहे. येथे अनेक अनधिकृत इमारती बांधण्यात आल्या आहेत. तथापि त्याकडे महानगरपालिकेचे लक्ष नाही; परंतु या कुटुंबावर मात्र कारवाई केली जात आहे. हा कोणता न्याय आहे ? येथील अधिकारी भ्रष्ट आहेत. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून हिंदु कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा.

महानगरपालिकेने दबावापोटी अयोग्य कार्यवाही केली ! – डॉ. विंडो कोठारी, बजरंग दलाचे गोरक्षा प्रमुख, मुंबई विभाग

४ वर्षांपासून सारिका जोगडिया आणि त्यांच्या कुटुंबाला धर्मांधांकडून त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तेव्हापासून मी त्यांच्या समवेत आहे. महानगरपालिकेने दबावापोटी अयोग्य कार्यवाही केली. या संदर्भात महानगरपालिकेच्या प्रभाग अध्यक्षांसह बैठक आयोजित करण्यात आली आहे.

हिंदु कुटुंबाला धीर देण्यासाठी आलेल्या ‘इस्कॉन’चे अधिवक्त्यांना पोलिसांनी कह्यात घेऊन सोडून दिले !

या वेळी ‘इस्कॉन’चे अधिवक्ता कृष्णा प्रभु हे जोगडिया कुटुंबाला धीर देण्यासाठी आले होते; मात्र त्यांच्यासह अन्य धर्माभिमान्यांना पोलिसांनी कह्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले आणि ‘अनुमती घेतली नसल्याने तुम्हाला आंदोलन करता येणार नाही’, असे सांगून नंतर सोडून दिले.

संपादकीय भूमिका

  • हिंदूबहुल भागात मुसलमानांना घर नाकारल्यावर आकाश-पाताळ एक करणारी काँग्रेस, साम्यवादी, पुरो(अधो)गामी, प्रसारमाध्यमे आदी आता मुसलमानबहुल भागात हिंदु कुटुंबाच्या करण्यात येणार्‍या छळाविषयी गप्प का ?
  • ‘सरकारी घर रिकामे करण्यासाठी हिंदु कुटुंबाला छळण्याचा अधिकार धर्मांधांना कुणी दिला ? हा कायदा हातात घेण्याचाच प्रकार नव्हे का ?’, असे प्रश्‍न आता कुणी का विचारत नाही ?
  • हिंदुत्वनिष्ठ सरकार सत्तेवर असतांना असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही !