प्रयागराज रेल्वे स्थानकावरील नमाजपठणामागे मोठे षड्यंत्र ! – अयोध्येतील मुसलमानांचा दावा

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथील रेल्वे स्थानकाच्या प्रतिक्षालयामध्ये सामूहिक नमाजपठण करण्यात आल्याच्या घटनेचा अयोध्येतील मुसलमानांनी विरोध केला आहे. त्यांनी नमाजपठण करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. बाबरी मशिदीचे पक्षकार राहिलेले इक्बाल अंसारी यांच्यासहित अनेक मुसलमान समाजसेवकांचे म्हणणे आहे की, अशा प्रकारच्या कृतीतून धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारने अशा प्रकरणात कठोर कारवाई केली पाहिजे; कारण यामागे मोठे षड्यंत्र आहे.

मशीद परिसरात नमाजपठण करण्यातच मुसलमानांचे भले आहे ! – बाबरी मशिदीचे पक्षकार इक्बाल अंसारी

इक्बाल अंसारी यांनी सांगितले की, भारतात नमाजपठणाविषयी अनेक कायदे आणि नियम आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करण्यात येऊ नये. मुसलमानांना भारताची राज्यघटना मानावी लागेल. मी सर्व मुसलमानांना त्याचे पालन करण्याचे आवाहन करत आहे. यावर राजकारण करू नये आणि कायद्याचे उल्लंघनही करू नये. मशीद परिसरात नमाजपठण करण्यातच मुसलमानांचे भले आहे.

नमाजपठण करणारा मौलाना हा आतंकवादी वाटतो ! – समाजसेवक अनीश खान

(मौलाना म्हणजे इस्लामी अभ्यासक)

समाजसेवी अनीश खान उपाख्य बबलू यांनी सांगितले की, नमाजपठणाच्या वेळी मौलाना त्यांच्या ८ वर्षांच्या मुलासमवेत होता. हा प्रकार चिथावण्याचा आहे. अशा कृतीने ते देशात आग लावत आहेत. हा मौलाना आतंकवादी संघटनेशी जोडलेला आहे, असे मला वाटते. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती करतो की, त्यांनी मौलानाची चौकशी करून त्याला अटक करावी.

संपादकीय भूमिका

अयोध्येतील मुसलमानांनी उघडपणे ही राष्ट्रवादी भूमिका घेतल्यासाठी त्यांचे अभिनंदन ! देशातील अशा मुसलमानांनी आता समोर येऊन उघडपणे बोलण्याची आवश्यकता आहे !