उदयपूर येथील हत्याकांड तालिबानी विचारसरणीचाच परिणाम ! – रा.स्व. संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारप्रमुख श्री. सुनील आंबेकर

नवी देहली – उदयपूर येथील हत्याकांड हे कुणी उकसावले म्हणून नव्हे, तर यास तालिबानी विचारसरणी कारणीभूत आहे. कुठे ‘हमास’ आहे, कुठे इस्लामिक स्टेट, तर कुठे तालिबान आहे ! आपल्या देशात ‘सिमी’ आणि ‘पी.एफ्.आय.’ आहे. जर कुणाला वाटत असेल की, उदयपूरची घटना कुणी तरी वक्तव्य करून उकसावल्याचा परिणाम आहे, तर त्यांनी अभ्यास वाढवण्याची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारप्रमुख श्री. सुनील आंबेकर यांनी व्यक्त केली.

१ जुलै या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने महंमद पैगंबर यांच्या विरोधातील कथित आक्षेपार्ह विधानावरून भाजपच्या तत्कालीन प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना सुनवाले होते. देशातील एकूण हिंसात्मक परिस्थितीला, तसेच उदयपूर येथील हत्याकांडाला नूपुर शर्मा या एकट्याच उत्तरदायी आहेत, असे न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत म्हणाले होते.

आंबेकर पुढे म्हणाले की, उदयपूरच्या तालिबानी घटनेमागे असलेली मानसिकता आणि मान्यता यांना समजणे महत्त्वपूर्ण आहे. ज्या देशाची धार्मिक कट्टरतावादाच्या आधारावर फाळणी झाली, त्याच्याकडून उदयपूरच्या घटनेकडे कानाडोळा केला जाऊ शकत नाही.