मला कुंभमेळ्याच्या वेळी श्री. चेतन राजहंस यांच्या समवेत सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. सेवा करतांना ‘साधकांविषयी दृष्टीकोन कसा असायला हवा ?’, हे समजावून सांगणे
‘मी श्री. चेतन राजहंस यांना पूर्वी भेटलो आहे; परंतु मला कुंभमेळ्याच्या सेवेच्या निमित्ताने प्रथमच त्यांच्यासह सेवा करण्याची संधी मिळाली. ‘त्यांच्या समवेत कुंभमेळ्यासारख्या विशेष प्रसंगी सेवा करण्याची संधी मिळणे’, हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण होते. कुंभमेळ्याच्या वेळी गुरुकृपेने मला ‘गृहव्यवस्थापन अन् निवासव्यवस्था पहाणे’ अशी सेवा मिळाली होती. मी ही सेवा प्रथमच करत होतो. तेव्हा चेतनदादांनी सेवेच्या पहिल्याच दिवशी ‘सेवा करतांना साधकांविषयी योग्य दृष्टीकोन कसा असायला हवा ?’, हे मला समजावून सांगितले.
२. गुणवैशिष्ट्ये
२ अ. तत्परता : चेतनदादा कुंभमेळ्यामध्ये सर्व प्रकारच्या सेवा करणे आणि प्रत्येक साधकाला साहाय्य करणे, यांसाठी सतत सिद्ध असायचे. ते साधकांना त्यांनी पुढे करावयाच्या सेवांविषयी कल्पना द्यायचे.
२ आ. प्रेमभाव
१. ते साधकांना त्यांच्या चुका प्रेमाने आणि चुकांच्या संभाव्य परिणामांसहित सांगायचे.
२. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि चेतनदादा यांच्यातील प्रीतीमुळे सर्व साधक त्यांनी सांगितलेली सेवा देहबुद्धी विसरून पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचे.
३. इतरांचा विचार करणे
अ. एका प्रसंगाच्या वेळी चेतनदादांचे छायाचित्र काढायचे होते. त्या वेळी त्यांनी नेहमीच्या ऐवजी दुसऱ्या एका साधकाला ती संधी दिली.
आ. एका साधकाची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना चालता येत नव्हते. माझ्याकडे आवश्यक ती औषधे उपलब्ध नसल्यामुळे मी त्यांना साहाय्य करू शकत नव्हतो. मी चेतनदादांना ही अडचण सांगितली. तेव्हा चेतनदादा सेवेत पूर्ण व्यस्त असूनही त्यांनी तत्परतेने त्या साधकासाठी आवश्यक ती औषधे खरेदी करून त्याला दिली.
इ. एकदा माझी प्रकृती ठीक नसतांना त्यांनी स्वतः मला औषध दिले आणि अनेक वेळा माझी विचारपूसही केली. तेव्हा मी त्यांच्यातील पितृतुल्य वात्सल्य अनुभवले.
४. नेतृत्वगुण
४ अ. साधकांना साधना आणि सेवा करण्यासाठी प्रेरित करणे : ते ‘साधकांवर गुरुकृपा व्हावी’, यासाठी साधकांना वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांना साधना आणि सेवा करण्यासाठी प्रेरित करायचे. ते साधकांना पुढे करावयाच्या सेवांची रूपरेखा नियमितपणे सांगायचे. यातून त्यांच्यातील नेतृत्वगुणाचे पैलू लक्षात येतात.
४ आ. अडचणीच्या वेळी सेवा करण्यास साहाय्य करणे : एकदा मी काही सेवांमध्ये व्यस्त असल्याने अन्य एक सेवा करू शकत नव्हतो. तेव्हा चेतनदादांनी इतर साधकांच्या साहाय्याने ती सेवा पूर्ण करण्यासाठी मला साहाय्य केले.
४ इ. एकदा सद्गुरु डॉ. पिंगळेकाकांची प्रकृती ठीक नसल्याने ते साधकांना मार्गदर्शन करू शकत नव्हते. तेव्हा चेतनदादांनी साधकांना योग्य मार्गदर्शन केले.
प.पू. गुरुदेवांच्या कृपेने श्री. चेतन राजहंस यांच्या माध्यमातून ‘योग्य नेतृत्वाखाली सेवा करतांना सेवेतील आनंद कसा द्विगुणित होतो !’, हे अनुभवण्याची मला संधी मिळाली. त्याबद्दल प.पू. गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता !
– श्री. राहुल किंगर, फरीदाबाद (२९.४.२०२१)