कोयना धरणात केवळ २० ‘टी.एम्.सी.’ पाणीसाठा !

(प्रातिनिधिक छायाचित्र)

सांगली, २ जून (वार्ता.) – सातारा, सांगली या दोन जिल्ह्यांसाठी पिण्याचे पाणी आणि शेती यांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या कोयना धरणात २ जून या दिवशी केवळ २० ‘टी.एम्.सी.’ (साठा क्षमता १०५.२५ ‘टी.एम्.सी.’) पाणीसाठा शिल्लक आहे. कोयना धरणातीलच पाण्यावर अवलंबून असणाऱ्या कृष्णा नदीने सांगलीत पाण्याचा तळ गाठला असून आयर्विन पूल येथील पाणीपातळी केवळ ५ फूट आहे. सर्वजण आता पावसाच्या प्रतीक्षेत असून येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास गंभीर पाणी संकटाला सामोरे जावे लागू शकते. याच समवेत वारणा धरणात ११.३० ‘टी.एम्.सी.’ इतका पाणीसाठा (साठा क्षमता ३४.४० ‘टी.एम्.सी.’) आहे.

सांगली जिल्ह्यातील धोम, कण्हेर, दूधगंगा, तुळशी, कासारी, पाटगा, धोम कलकवडी, उरमोडी, तारळी यांसह कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी या धरणातही आता अत्यल्प पाणीसाठा आहे. यंदाचा साठा १ जून २०२१ पेक्षाही अल्प आहे.