राज ठाकरे यांना पत्राद्वारे जीवे मारण्याच्या धमकी  

पत्रात उर्दू शब्दांचा वापर !

 

डावीकडून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर

मुंबई – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रामध्ये उर्दू शब्दांचा वापर करण्यात आला आहे. याविषयी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ११ मे या दिवशी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे याविषयीची तक्रार केली.

गृहमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर बाळा नांदगावकर प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना म्हणाले, ‘‘भोंग्यांचा विषय हाती घेतल्यापासून अशा प्रकारच्या धमक्या येत आहे. पत्रात मला आणि राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मी राज ठाकरे यांना पत्र दाखवले. त्यानंतर १० मे या दिवशी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन पत्राची प्रत दिली. पोलीस काय कारवाई करतात, ते पाहू. राज ठाकरे यांच्या केसाला जरी धक्का लागला, तर महाराष्ट्र पेटेल. या पत्रात ‘अजानविषयी जे करत आहात, ते बंद करा, अन्यथा तुम्हाला ठार करू. तुम्हाला तर सोडणार नाहीच; पण राज ठाकरे यांनाही मारून टाकू’, अशी धमकी देण्यात आली आहे. मी वारंवार राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबासाठी संरक्षण मागत आहे. राज्य सरकार याची नोंद घेत नाही. किमान केंद्रशासनाने तरी याची नोंद घ्यावी. भोंग्यांचा विषय धार्मिक नव्हे, तर सामाजिक आहे. संपूर्ण महाराष्ट्र नव्हे, तर देशातील लोकांना याचा त्रास होत आहे. हे सरकारने गांभीर्याने घेतले पाहिजे.’’