उद्घाटनाआधीच काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी समृद्धी महामार्गावरून २०० किमी प्रतिघंटा वेगाने गाडी चालवली !

काँग्रेसचे नेते आशिष देशमुख

नागपूर – नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग अद्याप उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे; मात्र तरीही या महामार्गावरून येथील काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी २१ एप्रिल या दिवशी सकाळी भरधाव म्हणजे तब्बल १७५ ते २०० किलोमीटर प्रतिघंटा या वेगाने गाडी चालवली. (महाविकास आघाडी सरकार २ मे या दिवशी या महामार्गाचे उद्घाटन करण्याचे नियोजन करत आहे. असे असतांना याच सरकारमधील एका पक्षाच्या नेत्याने येथे गाडी चालवणे कितपत योग्य आहे ? – संपादक)

‘नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर उद्घाटनापूर्वी गाडी चालवून विदर्भातील जनता आणि शेतकरी यांना विदर्भातील उत्पादन मुंबई येथील बाजारापर्यंत नेण्यासाठी या महामार्गाचा पुरेपूर वापर करावा’, असे आवाहन आशिष देशमुख यांनी केले आहे. वेगाने गाडी चालवून आशिष देशमुख यांनी हा महामार्ग किती उत्कृष्ट आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, अशी चर्चा आहे.

संपादकीय भूमिका

असा मनमानी प्रकार करणाऱ्या आशिष देशमुख यांच्यावर मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी कारवाई करावी !