स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी सनातन धर्मियांनी रणनीती आखणे आवश्यक ! – रघुनंदन शर्मा, माजी राज्यसभा खासदार तथा राष्ट्रीय अध्यक्ष, भारत रक्षा मंच

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भोपाळ (मध्यप्रदेश) येथे चौथे प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन पार पडले !

डावीकडून श्री. श्रीराम काणे, दीप्रज्वलन करतांना श्री. रामबाबू शर्मा, श्री. अभय वर्तक आणि श्री. विनोद यादव

भोपाळ (मध्यप्रदेश) – सनातन धर्माचे विशाल स्वरूप आणि त्याचा समृद्ध वारसा नष्ट करण्यासाठी त्यांच्याकडून शेकडो वर्षांमध्ये अनेक प्रयत्न झाले. आज सनातन धर्म संकुचित होत आहे. एकेकाळी सनातन धर्मीय शस्त्र सज्ज होते; पण आज ते निःशस्त्र झाले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी रणनीती आखणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यसभेचे माजी खासदार तथा भारत रक्षा मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रघुनंदन शर्मा यांनी केले. ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंनी संघटित व्हावे’, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील मानस भवन येथे चौथे प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाला विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे अनेक प्रतिनिधी उपस्थित होते. या अधिवेशनामध्ये हिंदुत्वनिष्ठांनी ‘जयतु जयतु हिंदु राष्ट्रम्’च्या जयघोषात भारताला हिंदु राष्ट्र करण्याचा संकल्प केला. अधिवेशनाचे सूत्रसंचालन श्री. प्रथमेश वाळके यांनी केले.

अधिवेशनाला उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

धर्मरक्षा दलाचे श्री. योगेश शर्मा, व्यावसायिक श्री. रामबाबू शर्मा, बाडी बरेली येथील गुरुकुलाचे संचालक श्री. प्रशांत राठी, भोपाळ येथील धर्मरक्षक संघटनेचे संस्थापक श्री. विनोद यादव, धर्मरक्षक संघटनेचे संयोजक श्री. अभय पंडित, हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीराम काणे, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक आणि सौ. संध्या आगरकर

अधिवेशनात हिंदुत्वनिष्ठांनी केलेले उद्बोधन

देशाला विश्वगुरु करण्यासाठी प्रत्येक कुटुंबामध्ये सनातन संस्कारांचे जतन झाले पाहिजे ! – प्रशांत राठी, संचालक, गुरुकुल, बाडी बरेली

हिंदु विद्यार्थ्यांना विद्यालयांमध्ये देवीदेवतांचे चित्र असलेल्या वह्या घेऊन जाण्यास अडवले जाते. हे पाहून आम्ही बाडी बरेलीमध्ये गुरुकुल चालू केले. प्रारंभी ते भाड्याच्या जागेत चालू होते; पण आज या गुरुकुलातून ४ शाखांमध्ये ४ सहस्रांहून अधिक मुले शिक्षण घेत आहेत. आपल्या घरातून संस्कार नष्ट होत आहेत. हे लक्षात घेऊन भारताला विश्वगुरु करण्याची प्रक्रिया आपल्या घरापासून चालू करावी लागेल. त्यासाठी प्रत्येक कुटुंबामध्ये सनातन संस्कांचे जतन झाले पाहिजे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आम्ही सर्वतोपरी साहाय्य करण्यास सिद्ध ! – रामबाबू शर्मा, व्यावसायिक

आज अन्य धर्मीय लोक संघटित आहेत आणि आपण हिंदू विखुरलेले आहोत. व्यापार्‍यांनाही हिंदूंचे रक्षण करावेसे वाटते; पण हिंदु समाज असंघटित असल्याने ते साहाय्य करू शकत नाहीत. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आम्ही सर्वतोपरी साहाय्य करण्यास सिद्ध आहोत.

हिंदूंची प्रभावी संपर्क यंत्रणा निर्माण करणे आवश्यक ! – विनोद यादव, संस्थापक, धर्मरक्षक संघटना, भोपाळ

हिंदु संघटनाचे कार्य करत असतांना आपला अहंकार वाढत असल्याचे लक्षात येते आणि हा अहंकारच आपल्या कार्यातील मोठा अडथळा बनतो. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनामुळे हा अहंकार कसा अल्प करायचा, हे समजते. आज हिंदु संघटनांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी हिंदूंची प्रभावी संपर्क यंत्रणा निर्माण करणे आवश्यक आहे.

हिंदु जनजागृती समिती हिंदूंना वैचारिक युद्धासाठी सक्षम करत आहे ! – अभय पंडित, संयोजक, धर्मरक्षक संघटन

हिंदु समाज वैचारिक दृष्टीने निद्रिस्त आहे. समाजाला हिंदु राष्ट्राची मागणी करण्यास शिकवणे, हे आपल्यासमोर मोठे आव्हान आहे. वैयक्तिक जीवनामध्ये धर्माचरण करणे आवश्यक आहे. हे धर्माचरणच आपल्याला हिंदु बनवते. येणार्‍या काळात वैचारिक युद्ध होतील. या वैचारिक युद्धात हिंदूंना सक्षम बनवण्याचे कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे.

हिंदूंच्या रक्षणासाठी ‘हिंदु राष्ट्र’ हाच एकमेव उपाय आहे ! -अभय वर्तक, धर्मप्रचारक सनातन संस्था

आज भारतात हिंदु धर्माला राज्यघटनेत कोणतेही विशेष संरक्षण उपलब्ध नाही. भारत हिंदु राष्ट्र असतांनाही राज्यघटनेत त्याला ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) घोषित करण्यात आले, हा हिंदु समाजावर मोठा अन्याय आहे. या अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी हिंदूंना प्रवृत्त करणे, हीच काळाची आवश्यकता आहे. तसेच हिंदूंच्या रक्षणासाठी ‘हिंदु राष्ट्र’ हा एकमेव उपाय आहे.