लेखकांनी हिंदुत्वनिष्ठ संघटनांची अपकीर्ती करणारे पुस्तक मागे घेतले !

मुंबई विद्यापिठाचे कुलपती आणि राज्यपाल यांच्याकडे तक्रार प्रविष्ट

  • विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्याने दिलेल्या नोटिसीचा आणि प्रविष्ट केलेल्या तक्रारीचा परिणाम ! – संपादक
  • हिंदुत्वनिष्ठ संघटनांची अपकीर्ती करणार्‍यांवर गुन्हे नोंद करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली, तरचते यापुढे असे करण्याचे धाडस करणार नाहीत ! – संपादक

मुंबई – हिंदु महासभा आणि विश्व हिंदु परिषद या संघटनांची अपकीर्ती करणार्‍या लेखकांना कायदेशीर नोटीस बजावल्याने त्यांनी याविषयी क्षमा मागितली आहे, तसेच अपकीर्ती करणारे ‘विपुल्स फाउंडेशन कोर्स-१’ हे पुस्तक मागे घेण्याची प्रक्रिया चालू केली आहे. रश्मी जिजेश करनाथ, दीपा शिवजी जमींदार आणि रेशमा शेख परब यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

१. विपुल प्रकाशनच्या ‘विपुल्स फाउंडेशन कोर्स-१’ या पुस्तकामध्ये हिंदुत्वनिष्ठ संघटनांची अपकीर्ती करणारे लिखाण आहे. त्यात म्हटले आहे, ‘हिंदु महासभा आणि विश्व हिंदु परिषद यांसारखे धार्मिक हिंदु समूह हिंदूंच्या हितासाठी सरकारला पावले उचलायला भाग पाडतात. ते सर्व जण मुसलमानांना पाकिस्तानचे समर्थक आणि राष्ट्रद्रोही मानतात. या दोन्ही संघटना हिंदु धर्मांधतेस प्रोत्साहन देतात. (या लेखकांचे अन्य धर्मियांच्या संघटनांविषयी अशा प्रकारे लिहिण्याचे धाडस झाले असते का ? – संपादक)

२. भाजपचे पदाधिकारी आणि विश्व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते अमोल जाधव यांनी तिन्ही लेखक अन् प्रकाशक यांना कायदेशीर नोटीस पाठवली. नोटिसीमध्ये त्यांनी म्हटले, ‘या पुस्तकामधील लिखाण देश आणि समाज यांविषयी हानीकारक आहे. लेखक आणि प्रकाशक यांनी मुंबई विद्यापिठाच्या सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागावी अन् वादग्रस्त लिखाण पुस्तकातून काढून टाकण्यात यावे.’

३. याविषयी अमोल जाधव यांनी मुंबई विद्यापिठाचे कुलपती आणि महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडेही तक्रार केली होती. त्यानंतर तिन्ही लेखकांनी विनाअट क्षमायाचना केली आहे. तसेच प्रकाशकांनी पुस्तक विक्रेत्यांना पत्र लिहून सर्व पुस्तके परत पाठवण्यास सांगितले आहे.