पानिपत मराठा शौर्यदिनी हुतात्मा मावळ्यांना शिवसेनेच्या वतीने अभिवादन !

पानिपत मराठा शौर्यदिनी हुतात्मा मावळ्यांना शिवसेनेच्या वतीने अभिवादन करतांना श्री. राजेश क्षीरसागर आणि अन्य शिवसैनिक

कोल्हापूर, १९ जानेवारी (वार्ता.) – १४ जानेवारी १७६१ हा दिवस मराठा साम्राज्यासाठी शौर्यगाथा मांडणारा दिवस आहे. इतिहासात नोंदवलेल्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव जरी झाला असला, तरी मराठ्यांचे सामर्थ्य, धाडस आणि शौर्य यांचे दर्शन या दिवशी झाले. पानिपतच्या युद्धात बलीदान देणार्‍या हुतात्मा मराठा मावळ्यांना शिवसेनेच्या राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अभिवादन करण्यात आले.

या वेळी श्री. राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘‘पानिपतच्या लढाईला आज २६१ वर्षे पूर्ण झाली आहेत; परंतु आजही पानिपतच्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या मर्द मावळ्यांच्या स्मृती जपल्या गेल्या. या युद्धात मराठा साम्राज्याने सदाशिवराव पेशवे आणि विश्वासराव पेशवे असे पराक्रमी गमावले. या लढाईत स्वराज्याचा प्रत्येक मावळा प्राणाची आहुती देऊन लढला. ही लढाई मराठे हरले; पण मराठे युद्ध मात्र जिंकले, अशी या शौर्य दिवसाची इतिहासात नोंद झाली. अब्दालीने या लढाईचा इतका धसका घेतला की, तो परत कधीच भारतात आला नाही. हा दिवस मराठ्यांसाठी शौर्य दिवस असून, सकल मराठ्यांसाठी प्रेरणा देणारा दिवस आहे.’’

या वेळी शिवसेना शहरप्रमुख श्री. जयवंत हारुगले, माजी नगरसेवक श्री. रविकिरण इंगवले, माजी नगरसेवक श्री. राजू हुंबे, सर्वश्री दीपक गौड, किशोर घाटगे, सुनील खोत, तुकाराम साळोखे यांसह शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.