…तर हिंदु धर्माविषयी चुकीची विधाने करणारे राहुल गांधी यांनाही अटक करावी लागेल ! – अधिवक्ता गौरव गोयल, सर्वोच्च न्यायालय

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी  हिंदु जनजागृती समिती

‘हिंदु देवतांचा अपमान अभिव्यक्तीस्वातंत्र्य; तर मोहनदास गांधींवर बोलणे अपराध का ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

अधिवक्ता गौरव गोयल

मुंबई – अभिव्यक्तीस्वातंत्र्य सर्वांना लागू व्हायला हवे; मात्र आपल्या देशात तसे होतांना दिसत नाही. हिंदु देवतांचा अपमान करणार्‍यांना एक न्याय आणि मोहनदास गांधींच्या विचारांशी असहमती दाखवणार्‍यांच्या विरोधात दुसरा न्याय, हा भेदभाव या देशात चालणार नाही. जर कालीचरण महाराज यांनी केलेले वक्तव्य चुकीचे ठरवून त्यांना अटक करणे योग्य असेल, तर राहुल गांधी यांनीही अनेकदा हिंदु धर्माविषयी चुकीची विधाने केली असल्याने त्यांनाही अटक करावी लागेल, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता गौरव गोयल यांनी केले.

५ जानेवारी २०२२ या दिवशी हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हिंदु देवतांचा अपमान अभिव्यक्तीस्वातंत्र्य; तर मोहनदास गांधींवर बोलणे अपराध का ?’, या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.

या परिसंवादात अधिवक्ता गौरव गोयल यांच्यासह इतिहासाचे अभ्यासक तथा लेखक-अधिवक्ता सतीश देशपांडे, ‘राष्ट्रीय वारकरी परिषदे’चे प्रवक्ते ह.भ.प. अरुण महाराज पिंपळे, छत्तीसगड येथील ‘सुदर्शन’ वृत्तवाहिनीचे ‘ब्युरो’ (केंद्र) प्रमुख श्री. योगेश मिश्रा आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांनीही त्यांचे विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. गुरुराज प्रभु आणि हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी केले. हा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम ३ सहस्र ७८४ हून अधिक जणांनी पाहिला.

गांधींवर टीका-टीप्पणी करणे, हा न्यायालयाने दिलेला अधिकार ! – अधिवक्ता सतीश देशपांडे, इतिहासाचे अभ्यासक तथा लेखक

अधिवक्ता सतीश देशपांडे

राष्ट्रापेक्षा मोठा कुणी असू शकत नाही. राज्यघटनेच्या कोणत्याही कलमात ‘अमुक एखाद्या व्यक्तीला ‘राष्ट्रपिता’ संबोधावे’, असे म्हटलेले नाही. तसेच कुणी व्यक्ती ‘राष्ट्रपिता’ असावी, अशीही आपल्याकडे व्यवस्था नाही. गांधी त्यांच्या विवादास्पद जीवनकाळात मुळातच ‘अलोकप्रिय’ होते. त्यामुळे आतापेक्षा त्यांच्या जीवनकाळात त्यांना अधिक टीकेचा सामना करावा लागला होता. गांधींवर टीका-टीप्पणी करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. न्यायालयाने तशी सूट दिली आहे. गांधींच्या कार्याचे मूल्यमापन व्हायला हवे.

 हिंदूंनी साधू-संतांच्या पाठीशी ठामपणे उभे रहाणे आवश्यक ! – ह.भ.प. अरुण महाराज पिंपळे, प्रवक्ते, राष्ट्रीय वारकरी परिषद

ह.भ.प. अरुण महाराज पिंपळे

आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस, अशा अनेक राष्ट्रपुरुषांचा अपमान या देशात केला गेला; मात्र केवळ गांधींवर टीका केली की, त्याला अपराध मानले जाते. थोडक्यात या देशात राष्ट्रप्रेमी साधू-संत, नागरिक यांसाठी एक कायदा आणि राजकीय नेत्यांसाठी वेगळा कायदा आहे. हिंदूंनी साधू-संतांच्या पाठीशी ठामपणे उभे रहाणे आवश्यक आहे.

चुकीच्या गोष्टींवर उपस्थित केलेल्या प्रश्नांचे संबंधितांना उत्तर द्यावेच लागेल ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. नरेंद्र सुर्वे

हिंदु देवतांची नग्न चित्रे काढणार्‍या म.फि. हुसेनला काँग्रेसने पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. हिंदु देवतांचा अपमान करणार्‍या कलाकारांना काँग्रेस पाठिंबा देते. काँग्रेस सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करते; मात्र गांधींविषयी कुणी प्रश्न उपस्थित केले, तर काँग्रेसला राग येतो. हिंदु आणि राष्ट्रप्रेमी नागरिक हे चुकीच्या गोष्टींवर प्रश्न उपस्थित करणारच आणि त्याचे उत्तर संबंधितांना द्यावेच लागेल.


श्री. योगेश मिश्रा

‘अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या संदर्भात समान मापदंड असायला हवेत. कायदेतज्ञांनी कालीचरण महाराजांना अटक करणे, त्यांच्यावर लावण्यात आलेली कलमे यांविषयी छत्तीसगड सरकार आणि पोलीस-प्रशासन यांच्या कारवाईवर आम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे’, असे मत छत्तीसगड येथील ‘सुदर्शन’ वृत्तवाहिनीचे ‘ब्युरो’प्रमुख श्री. योगेश मिश्रा यांनी व्यक्त केले.