अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशाच्या सीमांचे रक्षण सैनिक करत असल्याने आपले जीवन सुरक्षित आहे ! – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात जनतेने योगदान देण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग – अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सैनिक सीमेवर राहून देशाचे रक्षण करत असतात. त्यामुळे आपण शांतपणे जीवन जगू शकतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये देशासाठी त्यांनी दिलेले योगदान विसरता कामा नये. सैनिकांच्या दिनक्रमाचा अनुभव मी माझ्या प्रशिक्षणाच्या कालावधीत घेतला. मी एक भारतीय म्हणून मला त्यांचा अभिमान आणि गर्व आहे. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात जिल्हावासियांनी साहाय्य करून योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी ७ डिसेंबर या दिवशी ‘सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन’ सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी केले. या वेळी व्यासपिठावर जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

हुतात्मा झालेल्या सैनिकांचे स्मरण आणि त्यांना अभिवादन करून जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, ‘‘देशाच्या रक्षणासाठी सैनिक सदैव सीमेवर सेवा बजावत असतात. ही सेवा करत असतांना ते स्वतःच्या जिवाची कोणतीही पर्वा करत नाहीत. एकाच गणवेशात (युनिफॉर्ममध्ये) ते कित्येक दिवस लढत असतात. असे माजी सैनिक, वीर पिता, वीर माता, वीर पत्नी, त्यांचे पाल्य या सर्वांसाठी या निधीचा वापर केला जातो. त्यामुळे या निधी संकलनात जिल्हावासियांनी योगदान देऊन जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे.’’

या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दाभाडे, अपर जिल्हाधिकारी जोशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कापडणीस यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी भडकवाड यांनी ध्वजनिधी संकलन दिनाचा इतिहास, उद्दिष्ट, महत्त्व, स्वरूप आणि निधी संकलन करण्यासाठी राबवण्यात येणारे उपक्रम यांविषयीचा आढावा दिला.