कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा, म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या ताकदीचे उदाहरण ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली घोषणा, म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद किती असते ?, याचे उदाहरण आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘शेतकरी कायद्यांविरुद्ध देशभर विरोधाचे वातावरण होते. आंदोलने चालू होती आणि आजही चालूच आहेत. आपल्या सर्वांचे पोट भरणार्‍या अन्नदात्यांचे यात नाहक बळी गेले आहेत; पण या अन्नदात्याने स्वत:ची शक्ती दाखवून दिली. त्यांना माझे त्रिवार वंदन ! जे वीर या आंदोलनात प्राणांना मुकले, त्यांना मी या निमित्ताने नम्र अभिवादन करतो. महाविकास आघाडीने कृषी कायद्यांविरुद्धची भूमिका वारंवार घोषित केली आहे. मंत्रीमंडळ आणि विधीमंडळ येथेही या कायद्याच्या दुष्परिणामांवर चर्चा झाली. यापुढे असे कायदे आणण्यापूर्वी केंद्राने सर्व विरोधी पक्ष, तसेच संबंधित संघटना यांना विश्‍वासात घेऊन संपूर्ण देशाच्या दृष्टीने हिताचा निर्णय घ्यायला हवा. असे केले, तर आज जी नामुष्की ओढवली, ती पुन्हा ओढवणार नाही. हे कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रियाही लवकरात लवकर पूर्ण होईल, अशी माझी अपेक्षा आहे.’’