बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांविषयी तृणमूल काँग्रेस गप्प ! – भाजपचा आरोप

भाजपचे प्रवक्ते समीक भट्टाचार्य

कोलकाता (बंगाल) – ट्विटरवर सक्रीय असणारे तृणमूल काँग्रेसचे नेते आणि त्यांच्या जवळच्या ‘सुप्रसिद्ध’ व्यक्तींनी बांगलादेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये श्री दुर्गादेवीच्या पूजेच्या वेळी हिंदूंवर झालेल्या आक्रमणांचा साधा निषेधही नोंदवलेला नाही. तृणमूल काँग्रेस आणि विचारवंत यांच्या ढोंगीपणाचा बुरखा आता फाटला आहे. आम्हाला या आक्रमणांच्या निषेधार्थ त्यांनी कुठलाही मेणबत्ती मोर्चा काढलेला दिसला नाही, त्यांच्या दुकानातील मेणबत्त्या संपल्या होत्या का ? अशा शब्दांत भाजपचे प्रवक्ते समीक भट्टाचार्य यांनी तृणमूल काँग्रेसवर टीका केली. ते येथे एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

भट्टाचार्य म्हणाले की, शेजारील देशांतील अल्पसंख्यांक नागरिकांची प्रामाणिकपणे चिंता करणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. आम्ही हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर जिहाद्यांनी  केलेल्या आक्रमणाचा तीव्र निषेध करतो. (केंद्रातील भाजप सरकारने बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे हिंदूंना अपेक्षित ! – संपादक)