बिहारमध्ये ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून ३ वर्षांत १० सहस्र हिंदूंचे धर्मांतर !

अनुसूचीत जाती आणि जमाती समाजातील लोक धर्मांतराचे सर्वाधिक बळी !

  • देशभर धर्मांतरबंदी कायदा लागू करण्याची आवश्यकता यातून स्पष्ट होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात धर्मांतर होत असतांना सरकारी यंत्रणा झोपल्या होत्या का ? – संपादक
  • बिहारमध्ये जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांचे सरकार आहे. अशा घटना रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक ! – संपादक
(प्रतिकात्मक छायाचित्र)

पाटणा (बिहार) – बिहारच्या ग्रामीण भागात अनुसूचीत जाती आणि जमाती समाजातील लोकांचे ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून मोठ्या प्रमाणात धर्मांतर करण्यात येत आहे. बांका जिल्ह्यातील चांदन, कटोरिया आणि बाँसी येथील गावकरी या धर्मांतराला बळी पडले असून जयपूर, भैरवगंज, बाबूमहल, बेलहरिया, आमगाछी, बसमत्ता, चांदन यांसह विविध भागांमधील चर्च ही धर्मांतराची केंद्रे बनली आहेत.

१. हिंदूंना त्यांच्या धर्मग्रंथांविषयी चुकीची माहिती देऊन त्यांच्या मनात ख्रिस्ती पंथाविषयी आकर्षण निर्माण करण्यात येते. विशेषत: ग्रामीण भागातील गरीब लोकांना प्रलोभने देऊन त्यांचे धर्मांतर करण्यात येते. अलीकडेच गया आणि सारण येथे अशा घटना समोर आल्या आहेत.

२. यासंदर्भात दैनिक ‘जागरण’ने डॉ. राहुल कुमार यांचा विस्तृत अहवाल प्रकाशित केला आहे. यात सांगितल्याप्रमाणे मागास भागांमध्ये प्रत्येक रविवारी चर्चचे प्रतिनिधी एका बैठकीचे आयोजन करतात, तसेच धर्मांतर करणार्‍यांसाठी प्रत्येक रविवारी येशूची प्रार्थना ठेवली जाते. मागील २ – ३ वर्षांमध्ये अनुमाने १० सहस्रांहून अधिक लोकांचे धर्मांतर करण्यात आले आहे.

३. दळणवळणबंदीच्या काळात या भागात हातपंप (हॅण्डपंप) बांधण्यात आले. त्याला ‘जिसस वेल’ संबोधण्यात आले. ‘अशा हातपंपांमध्ये येशूने प्रवेश केला आहे. त्यामुळे ते पाण्याचे एक नैसर्गिक माध्यम बनले आहेत’, असे लोकांना सांगितले गेले. जी कुटुंबे धर्मांतर करतात, त्यांना त्यांना हातपंप बांधून दिली जातात.

४. ख्रिस्ती झालेल्या कुटुंबांतील मुलांना शिकण्यासाठी चर्चमध्ये बोलावले जाते. तेथे त्यांना काही साहित्य दिले जाते. तसेच मुलींच्या लग्नासाठी पैसे दिले जातात.

५. काही दिवसांपूर्वी बिहारमधील सारण येथे धर्मांतर होत असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या. ख्रिस्ती मिशनरी आमिषे दाखवून हिंदूंचे धर्मांतर करत आहेत. गावकर्‍यांच्या मते, एका वर्षात ५०० हून अधिक लोकांनी धर्मांतर केले आहे. यात महिलांचा समावेश अधिक आहे. जुलै २०२१ मध्ये दैनिक ‘भास्कर’ने दिलेल्या माहितीनुसार गयामध्ये मागील २ वर्षांत अनुमाने ६ गावांमध्ये धर्मांतर करण्यात आले आहे.

. दैनिक ‘भास्कर’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये बांकाचे पोलीस अधीक्षक अरविंद गुप्ता यांचे मत नोंदवण्यात आले आहे. ते म्हणाले, ‘‘लोकशाही धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देते. त्यामुळे कोणतीही व्यक्ती कोणताही धर्म स्वीकारण्यासाठी स्वतंत्र आहे.’ धर्मांतराच्या प्रकरणी त्यांनी सांगितले की, ‘बळजोरीने धर्मांतर करणे गुन्हा आहे; परंतु अजूनपर्यंत याची तक्रार मिळाली नाही. तक्रार मिळाली, तर कारवाई केल्या जाईल.’ (आमिषे दाखवून धर्मांतर होत असल्याचे २ मोठी वृत्तपत्रे सांगत आहेत. असे असतांनाही पोलीस त्याकडे दुर्लक्ष करता, हे संतापजनक होय. असे पोलीस हिंदूंचे रक्षण काय करणार ? – संपादक)