अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने १५ ऑगस्टनिमित्त विविध उपक्रम साजरे !

ऐरोली येथे ३० मीटरचा तिरंगा घेऊन जातांना विद्यार्थी

मुंबई – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नवी मुंबई विभागाच्या वतीने विद्यार्थी आणि जनता यांच्यामध्ये जनजागृती करण्यात आली. यामध्ये विविध ठिकाणी भारतमातेचे प्रतिमापूजन, ध्वजारोहण, तिरंगा यात्रा, मुखपट्टी (मास्क) वितरण, कोरोना योद्धा सन्मान, तुळशी रोप वितरण, भारतमाता प्रतिमापत्रक वाटप आदी उपक्रम राबवण्यात आले.

ऐरोली विभागातील यादवनगर येथे ३० मीटरचा तिरंगा घेऊन तिरंगा यात्रा काढण्यात आली. ८ ठिकाणी भारतमाता प्रतिमापूजन करून मुखपट्टी वितरण करण्यात आले. वाशी भागात १६ ठिकाणी भारतमाता प्रतिमापूजन आणि तुळशीचे रोप वितरण करण्यात आले. नेरूळ भागात अनाथालयाला भेट देऊन तेथील मुलांसमवेत ध्वजारोहण  चित्रकला स्पर्धा आणि अन्य उपक्रम घेण्यात आले. कार्यकर्त्यांनी सिद्ध केलेले शुभेच्छापत्रक पोलीस, आधुनिक वैद्य, रुग्णवाहिका चालक, सुरक्षारक्षक यांचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून सन्मान करण्यात आला. तेरणा महाविद्यालयासह अन्य ९ ठिकाणी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.