आतापर्यंत ९ काश्मिरी हिंदूंना त्यांची काश्मीरमधील मालमत्ता परत मिळाली ! – केंद्रशासन

५२० काश्मिरी हिंदु काश्मीर खोर्‍यात परतले !

केवळ ९ काश्मिरी हिंदूंना त्यांची मालमत्ता मिळाली, ही स्थिती खेदजनक आहे. याचा अर्थ काश्मीरमध्ये अजूनही हिंदूंना सुरक्षित वातावरण निर्माण झालेले नाही. तेथील धर्मांध आणि जिहादी आतंकवादी यांचा निःपात केला, तरच तेथे हिंदूंना सुरक्षित वाटेल ! – संपादक

प्रातिनिधिक छायाचित्र

नवी देहली – काश्मीरमधील विस्थापित हिंदूंची मालमता त्यांना पुन्हा मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. त्यातील काही जणांना मालमत्ताही परत देण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण ९ काश्मिरी हिंदूंना त्यांची मालमत्ता परत देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्र सरकारने राज्यसभेत दिली.

१. माहिती देतांना केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले की, काश्मीरमधील सर्व जिल्ह्यांतील स्थलांतरित काश्मिरींच्या मालमत्तेचे कायदेशीर संरक्षक हे जिल्ह्यांचे जिल्हा दंडाधिकारी असणार आहेत. जर कुणी या मालमत्तेवर अतिक्रमण केले असेल, तर जिल्हाधिकारी त्यावर कायदेशीर कारवाई करतील. काश्मिरी हिंदु त्यांची भूमी परत मिळवण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क साधू शकतात.

२. जम्मू-काश्मीर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार कलम ३७० रहित केल्यापासून एकूण ५२० स्थलांतरित लोक काश्मीरमध्ये परतले आहेत. त्यांना ‘पंतप्रधान विकास पॅकेज -२०१५’ अंतर्गत तेथे नोकरी मिळू शकणार आहे.