बकरी ईदसाठी कोरोना नियम शिथिल करण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने केरळमधील साम्यवादी सरकारकडे मागितले उत्तर !

केरळमधील साम्यवादी आघाडी सरकार मुसलमानांना खुश करण्यासाठी लोकांच्या जिवाशी खेळून कोरोना नियमांत सूट देत आहे, हे उघड आहे. कुंभमेळ्यात हिंदूंना मोठ्या प्रमाणात सहभागी होऊ दिल्यावरून टीका करणारे देशातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष आदी राजकीय पक्ष, तसेच निधर्मीवादी अन् पुरो(अधो)गामी संघटना केरळ सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात गप्प का आहेत, हे त्यांनी सांगितले पाहिजे !

नवी देहली – बकरी ईदसाठी केरळमधील साम्यवादी आघाडी सरकारने कोरोनाविषयीचे नियम शिथिल केले आहेत. याला आव्हान देत इंडियन मेडिकल असोसिएशनने (‘आय.एम्.ए.’ने) सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना यावर उत्तर देण्याचा आदेश सरकारला दिला आहे. यावर उद्या, २० जुलै या दिवशी सुनावणी होणार आहे. सरकारच्या निर्णयावर न्यायालयाने कोणतेही मत नोंदवलेले नाही. ‘बकरी ईदच्या कालावधीमध्ये कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत राज्यशासनाने नियमांमध्ये सूट दिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते’, असे आय.एम्.ए.चे म्हणणे आहे. केरळ सरकारने बकरी ईदनिमित्त अधिकाधिक ४० जणांना एका जागी जमण्यास अनुमती दिली आहे; मात्र या ४० जणांनी लसीचा किमान एक डोस घेणे बंधनकारक आहे.