उजनीच्या पाणी प्रश्‍नावरून शेतकर्‍यांचे ‘रास्ता रोको’ आंदोलन !

‘रास्ता रोको’ आंदोलन

वडापुरी (जिल्हा सोलापूर) – उजनीतील ५ टी.एम्.सी. पाणी इंदापूरला देण्याचा निर्णय रहित करण्यात आल्याने तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.  वडापुरी येथील इंदापूर-बावडा रस्त्यावर शेतकर्‍यांनी पुणे जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबीले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. तालुक्याला पाणी देण्यासाठीच्या रहित केलेल्या निर्णयाचा शासनाने फेरविचार करावा, अन्यथा जिल्हा परिषद सदस्यत्वाचे त्यागपत्र देईन, अशी चेतावणी तांबीले यांनी केली. या वेळी जेष्ठ नेते हणुमंतराव जगताप, सतीश पांढरे, हनुमंत जगताप, शिवाजी तरंगे यांच्यासह अनेक शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

मागील कित्येक वर्षांपासून आमच्या पूर्वजांनी २२ गावच्या पाण्यासाठी संघर्ष केला. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरकरांना न्याय देण्याचा प्रयत्न केला; परंतु विरोधकांनी तो प्रयत्न कुरघोड्या करत हाणून पाडला. इंदापूर तालुक्यातील अनेक गावे उजनीच्या पाण्यात गेली असून सहस्रो हेक्टर भूमी त्यासाठी दिल्या आहेत. उजनीच्या पाण्यावर इंदापूरकरांचा हक्क असतांना त्यासाठी झगडावे लागत आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील २२ गावांना पाणी मिळाल्याविना गप्प बसणार नसल्याचे तांबीले यांनी सांगितले आहे.