संभाजीनगर – गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत; मात्र असे असतांना उस्मानपुरा येथील फिरोज खान कदीर खान (वय ५० वर्षे) यांनी केशकर्तनालय चालू केले होते. पोलीस त्यांच्यावर कारवाई करून त्यांना पोलीस ठाण्यात नेत असतांना ते खाली पडून घायाळ झाले. या वेळी त्यांचा मृत्यू झाला. मृताच्या नातेवाइकांनी पोलिसांच्या मारहाणीमुळे फिरोज खान कदीर खान यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.
उस्मानपुरा पोलीस ठाण्यासमोर मृतदेहासह ठिय्या आंदोलन
फिरोज खान यांच्या नातेवाइकांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यासमोर मृतदेहासह ठिय्या आंदोलन केले. संबंधित अधिकार्यांना निलंबित करत गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. कारवाई होईपर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतली. घटनेची माहिती मिळताच अनेक नागरिकांनीही पोलीस ठाण्याच्या परिसरात गर्दी केली होती. यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलीस अधिकार्याचे स्थानांतर करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे !
घटनेची माहिती मिळताच खासदार इम्तियाज जलील यांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यासमोर येऊन संबंधित पोलीस अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. या वेळी पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी संबंधित पोलीस अधिकार्यावर तात्काळ स्थानांतर करण्याचे आश्वासन दिले. या वेळी खासदार जलील यांनी जमावाला शांत रहाण्याचे आवाहन केले. कारवाईच्या आश्वासनानंतर ‘ठिय्या आंदोलन’ मागे घेण्यात आले आहे.