सत्ता बळकावण्यासाठी मोदी शासन आणि भाजप यांची कुठल्याही पातळीवर जाण्याची सिद्धता ! – सचिन सावंत, काँग्रेस

सचिन सावंत

मुंबई – साम, दाम, दंड आणि भेद वापरून कोणत्याही परिस्थितीत सत्ता बळकवायची. जनतेने पाठिंबा दिला नसेल, तर तो पाठिंबा चुकीच्या मार्गाने मिळवण्याचा भाजपाचा सातत्याने प्रयत्न असतो. यासाठी केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग केला जातोय. सत्ता बळकावण्यासाठी मोदी शासन आणि भाजप यांची यांची कुठल्याही पातळीवर जाण्याची सिद्धता असते, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी २१ मार्च या दिवशी पत्रकार परिषदेत केला.

या वेळी सचिन सावंत म्हणाले, ‘‘ज्या पद्धतीने महाराष्ट्रात जाणीवपूर्वक वातावरण निर्माण केले जात आहे, हे वातावरण देश पातळीवरती जिथे-जिथे विरोधी पक्षांची सरकारे आहेत, तेथे निर्माण केले जात आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यूच्या प्रकरणात मुंबई पोलिसांची अपकीर्ती केली गेली. ही पार्श्‍वभूमी विसरता येण्यासारखी नाही. एकंदरच या सर्व यंत्रणाचा राजकीय स्वार्थासाठी वापर केला जात आहे, यात कुठलीही शंका नाही.’’