रत्नागिरी येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. सुभाष केशव कदम यांचा साधनाप्रवास

श्री. सुभाष केशव कदम

१. बालपणी साधनेची शिकवण नसणे

‘मला बालपणापासून साधनेची आवड नव्हती. माझ्या घरचे वातावरणही साधनेला पूरक नव्हते. सणवार असेल, त्या वेळी मी केवळ देवपूजा करत असे. वर्ष १९८१ मध्ये नोकरीनिमित्त रत्नागिरी येथे आल्यावर प्रतिदिन श्रीराममंदिरात आरतीसाठी जात होतो.

२. साधनेला आरंभ

वर्ष १९९७ पासून मी ‘सनातन संस्थे’च्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला.

३. साधना करू लागल्यावर स्वत:मध्ये जाणवलेले पालट

अ. वर्ष २००४ मध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’ मधील चौकट वाचून माझे तंबाखूचे व्यसन सुटले.

. मी साधना करू लागल्यानंतर नोकरीतून मिळणार्‍या वेतनावर मला समाधानी रहाता आले.

४. साधना करू लागल्यावर आलेल्या अनुभूती

१. हृदयविकाराचे ३ झटके येऊनही गुरुकृपेमुळे त्याला सामोरे जाण्याचे बळ मिळणे : वर्ष २००८ मध्ये मला पहिला हृदयविकाराचा झटका आला. रात्री २ वाजता छातीमध्ये दुखू लागले. डॉक्टरांकडे गेल्यावर ते म्हणाले, ‘एक घंटा जरी उशीर झाला असता; तरी काही उपयोग झाला नसता.’ त्या वेळी ‘अ‍ॅलोपॅथीक’ औषधे पुष्कळ महाग होती; म्हणून ५ वर्षे आयुर्वेदीय औषधे घेतली. त्यानंतर वर्ष २०१२ मध्ये हृदयविकाराचे एका पाठोपाठ दोन झटके येऊन गेले. त्यानंतर ‘अँजिओप्लॅस्टी’ झाली. या सर्व संकटांना सामोरे जाण्यासाठी गुरुदेवांनी मला बळ दिले. आज मी केवळ गुरुदेवांच्या कृपेमुळेच जिवंत आहे.

२. तरुण मुलाच्या निधनाच्या धक्क्यातून गुरुकृपेमुळे सावरू शकणे : वर्ष २०१५ मध्ये माझ्या २६ वर्षीय मुलाचे अपघाती निधन झाले. त्या वेळी केवळ गुरुमाऊलीची कृपा आमच्या पाठीशी असल्यामुळे आम्ही त्यातून सावरू शकलो.

‘परात्पर गुरु डॉक्टर, तुमच्या कृपेमुळेच मी हे लिखाण लिहू शकलो. मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्री. सुभाष केशव कदम, मिरजोळे, रत्नागिरी.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक