वीजचोरी करणार्‍यांच्या विरोधात पश्‍चिम महाराष्ट्रात महावितरणची धडक कारवाई

सातारा, ७ फेब्रुवारी (वार्ता.) – वीजतारांवर आकडे टाकून किंवा मीटरमध्ये फेरफार करून विजेचा उपयोग करणार्‍या वीज चोरांविरोधात महावितरणने धडक कारवाई चालू केली आहे, अशी माहिती प्रादेशिक संचालक प्र. नाळे यांनी दिली.

प्र. नाळे पुढे म्हणाले की, महावितरणने पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये गत दीड मासात १ सहस्र ८७६ ठिकाणी ४ कोटी ५७ लाख रुपयांच्या वीजचोर्‍या उघडकीस आणल्या आहेत. नियमित विशेष मोहिमेमध्ये घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील जोडण्यांविषयी ही कारवाई करण्यात आली आहे. उघडकीस आणलेल्या वीजचोर्‍यांपैकी ५६६ प्रकरणांत ९९ लाख रुपयांची वसुलीही करण्यात आली आहे. वीजचोर्‍यांच्या प्रकरणी भारतीय विद्युत कायदा २००३ नुसार कलम १३५  अन्वये कारवाई चालू आहे. दंड, कारावासाची शिक्षा आणि मानहानी टाळण्यासाठी वीजचोरी थांबवून अधिकृत जोडण्या घ्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.