हिंदुद्वेषी शरजील उस्मानी याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा !

रामनवमी शोभायात्रा समिती आणि भाजप यांची मागणी

जिल्हाधिकार्‍यांना (उजवीकडे) निवेदन देतांना भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते

अकोला – पुणे येथे ३० जानेवारी या दिवशी झालेल्या ‘एल्गार परिषदे’त हिंदुद्वेषी शरजील उस्मानी याने हिंदु धर्म आणि समाज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात रामनवमी शोभायात्रा समिती आणि भाजप यांच्या वतीने रोष व्यक्त करून शरजील याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे केली. येथील भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली ३ फेब्रुवारी या दिवशी हे निवेदन देण्यात आले आहे. या वेळी भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, शरजील याने भाषणात हिंदु समाजाविषयी अपशब्द काढून हिंदु समाजाचा अवमान केला होता. हे कृत्य हिंदुस्थानमध्ये राहून हिंदूंविरुद्ध करण्यात आलेले षड्यंत्र आहे. शरजील याच्या वक्तव्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणी राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

भारतात राहून हिंदूंविषयी अपशब्द बोलणे अयोग्य ! – आमदार गोवर्धन शर्मा

भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा म्हणाले, ‘‘भारतात राहून हिंदु धर्माविषयी अपशब्द बोलणे, हे अयोग्य आहे. शरजील याच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. हेच वाक्य जर पाकिस्तानमध्ये मुसलमानांविषयी म्हटले गेले असते, तर त्याचे परिणाम काय झाले असते, ते सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे हिंदूंचा अंत पाहू नये. शरजील याच्यावर गुन्हा नोंद करून त्याला अटक करावी.’’