राज्यात बियाणांचे ३०० नमुने निकृष्ट

शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या आस्थापनांचे परवाने रहित करून फौजदारी कारवाई ! – मुख्यमंत्री

प्रतिकात्मक चित्र

नागपूर – विदर्भासह राज्यात बियाणांचे ५ सहस्र नमुने पडताळण्यात आले. त्यांतील ३०० नमुने निकृष्ट ठरले. त्यामुळे शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या नफेखोर आस्थापनांचे केवळ परवाने रहित न करता त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हे नोंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ११ जुलै या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली. मुख्यमंत्र्यांनी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे भावपूर्ण येथे दर्शन घेतले. ते म्हणाले, ‘‘राज्यशासनाने शेतकर्‍यांना दिलेली महाराष्ट्राच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी कर्जमाफी असून ५० सहस्र रुपयांची जाचक अट रहित करून शेतकर्‍यांना सरसकट २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली आहे.’’

या वेळी पुण्यातील मोशी येथील इमारत दुर्घटनेत अनधिकृत बांधकाम करणार्‍या दोषींवर कठोर कारवाईची ग्वाही त्यांनी दिली. राज्यामध्ये आतंकवादविरोधी पथकाने देशद्रोही शक्तींविरुद्ध मोठी कारवाई केली असून अनेक महत्त्वपूर्ण धागेदोरे हाती लागले आहेत. ती माहिती लवकरच घोषित केली जाईल, असे त्यांनी सांगितले.