कळंबोलीत बसथांब्याचे छत उभारून दिशादर्शक फलक लावावा ! – नागरिकांची मागणी

कळंबोली – कळंबोली परिसरातील रस्ते आणि नाले यांच्या कामासाठी हटवलेली एन्.एम्.एम्.टी. (नवी मुंबई महापालिका परिवहन सेवा) बसथांब्याचे छत आणि दिशादर्शक फलक कामाच्या पूर्ततेनंतर पुनर्स्थापित केलेले नाहीत. प्रवासी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थी यांना निवार्‍याअभावी रस्त्यावर किंवा पदपथावर उभे रहावे लागते. प्रशासनाने सांगितले, ‘हे बसथांबे पनवेल महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले असल्याने छत उभारण्याचे दायित्व महापालिकेचे आहे.’ बसथांब्यांच्या ठिकाणी बेकायदेशीररित्या वाहने उभी केली जात असल्याने प्रशासनाच्या बसगाड्या थांब्यापर्यंत पोचू शकत नाहीत. परिणामी बसगाड्या मध्यभागीच थांबवाव्या लागतात. यामुळे प्रवाशांना रस्त्यावर भरधाव वाहतुकीतच बसमध्ये चढ-उतार करावा लागतो. या पार्श्वभूमीवर ‘महानगरपालिकेने तातडीने बसथांब्याचे छत उभारावे आणि बेकायदेशीररित्या वाहनांवर कठोर कारवाई करावी’, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

संपादकीय भूमिका

  • प्रवाशांचा प्रवास असुविधाजनक आणि धोकादायक होऊ देणार्‍या परिवहन सेवेची दुरवस्था लवकर दूर करावी !
  • प्रवाशांची गैरसोय होऊ देणार्‍यांवरही कारवाई व्हायला हवी !
  • अशी मागणी नागरिकांना का करावी लागते ? महापालिका प्रशासन ही कामे स्वतःहून का करत नाही ?
  • एन्.एम्.एम्.टी. प्रशासन यासाठी महापालिकेचा पाठपुरावा का घेत नाही ?