‘गुलाबी ई-रिक्शा’ प्रश्नावर आमदार प्रसाद लाड यांना बोलू न दिल्याने भाजप आमदारांचा गदारोळ !

मुंबई, ३ जुलै (वार्ता.) –  ‘गुलाबी ई-रिक्शा’ विषयावरील चर्चेच्या वेळी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना बोलण्याची संधी नाकारण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या आमदार लाड यांनी सभागृहाच्या मध्यभागी जाऊन गदारोळ केला. त्यांच्या समर्थनार्थ भाजपचे इतर सदस्यही तेथे आले. या गदारोळानंतर मंत्री आदिती तटकरे यांनी मध्यस्थी करत ‘आमदार प्रसाद लाड आणि इतर सदस्यांच्या काही सूचना किंवा हरकती असतील, तर त्या संदर्भात सर्व संबंधित आमदारांची एक स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल’, असे आश्वासन दिले. त्यानंतर सभागृहातील वातावरण शांत झाले.

राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी शासनाच्या वतीने ‘गुलाबी ई-रिक्शा’ योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येत आहे. १० सहस्र महिला लाभार्थ्यांना या रिक्शा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.  सध्या १३० ‘गुलाबी ई-रिक्शां’चे वितरण करण्यात आले आहे. चालू वर्षामध्ये ५ सहस्र महिलांना प्रशिक्षित या रिक्शा देण्यात येतील. आतापर्यंत ९ सहस्र ९४० आवेदने प्राप्त झाली आहेत, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत दिली.