सांगलीतील वीजपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी उपाययोजना ! – ऊर्जा राज्यमंत्री

मेघना साकोरे-बोर्डीकर, राज्यमंत्री

मुंबई – सांगली जिल्ह्यासह राज्यातील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी अतिरिक्त उपकेंद्रे, रोहित्र उभारणी, जीर्ण वीजवाहिन्या आणि खांबांचे नूतनीकरण, तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर चालू असून येत्या काळात राज्यातील वीज समस्यांमध्ये आणखी घट होईल, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषद सदस्य अरुण लाड यांनी सांगली जिल्ह्यातील रोहित्र वीजपुरवठ्याच्या समस्यांविषयी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना त्या बोलत होत्या.

या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य अनिकेत तटकरे, धैर्यशील कदम, सदाशिव खोत, विक्रम काळे यांनी सहभाग घेतला.

राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर पुढे म्हणाल्या, ‘‘राज्यात वितरण रोहित्र जळण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा लक्षणीयरित्या अल्प झाले आहे. राज्यात वाढत्या वीज मागणीचा विचार करून ‘एशियन डेव्हलपमेंट बँके’च्या सहकार्याने ज्या ठिकाणी अतिरिक्त उपकेंद्रे आणि रोहित्रे यांची आवश्यकता आहे, त्याचा सर्वसमावेशक आराखडा सिद्ध करण्यात आला असून टप्प्याटप्प्याने ही कामे चालू आहेत. जीर्ण झालेले विजेचे खांब आणि तारांच्या दुरुस्ती यांसाठी शासनाकडून प्रतीवर्षी देखभाल निधी उपलब्ध करून दिला जातो. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मिळून अनुमाने ४ सहस्र देखभाल कंत्राटदारांना सूचीबद्ध करण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून दुरुस्ती आणि देखभाल यां कामे नियमितपणे केली जात आहेत.’’