प्रदूषित पाणी आणि प्रदूषण यांवर उपाययोजना करत आहोत ! – पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे

प्रदूषित पाण्याने ६ गोमातांचा मृत्यू झाल्याने गर्भवतींसाठीही ते धोकादायक असल्याचा आरोप

मुंबई, १ जुलै (वार्ता.) – रायगडच्या आमदारांनी गेल्या सप्ताहात पनवेलमधील प्रदूषित नदीचे पाणी सभागृहात आणले होते. ते प्रदूषित पाणी प्यायल्याने ६ गोमाता मृत्यू पावल्या. ते पाणी पिण्यास अपायकारक आहे. विशेषत: गर्भवतींच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे, असे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे भाई जगताप यांनी विधान परिषद सभागृहाच्या िनदर्शनास आणून दिले. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, रायगड परिसरातील कारखान्यांमुळे प्रदूषणात वाढ झाल्याविषयी ठाकरे गटाचे सुनील शिंदे यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या चर्चेत ते बोलत होते. यावर ‘प्रदूषणासंबंधी सामान्य नागरिक जागरूक झाला असून त्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यावर कारवाई करण्यासाठी मनुष्यबळ अपुरे पडत आहे. त्यावर आम्ही उपाययोजना करत आहोत’, असे पर्यावरण आणि वातावरणीय पालट मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.

सुनील शिंदे म्हणाले,

१. मुंबईतील मोठे, मध्यम आणि लहान अशा एकूण ३४ सहस्र ६९६ कारखान्यांपैकी ३० सहस्र ६४१ कारखान्यांची प्रदूषण पातळी वाढली आहे.

२. त्यातील ८ सहस्र ५०० कारखान्यांनी अती धोकादायक मानला जाणारा ६० पेक्षा अधिक प्रदूषण निर्देशांक गाठला आहे. ४ सहस्र ५५ कारखान्यांचा प्रदूषण निर्देशांक २० पेक्षा अल्प आहे. कल्याण विभागात सर्वाधिक २ सहस्र ६८५ कारखाने प्रदूषणकारक ठरल्याने धोक्याची पातळी वाढली आहे.

३. कारखान्यांच्या प्रदूषणांमुळे सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. या गंभीर प्रश्नांकडे सरकारचे लक्ष नाही. सरकारकडून केल्या जाणार्‍या उपाययोजना तुटपुंज्या आहेत.

‘‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ’ या महामंडळाचे नाव ‘महाराष्ट्र प्रदूषण निर्मूलन महामंडळ’ असे केले पाहिजे.’’  – प्रमोद जठार, भाजप