सर्व ग्रामपंचायतींमध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्र’ येत्या ३ महिन्यात चालू करा ! – सुधाकर तेलंग, सेवा हक्क आयुक्त

प्रतिकात्मक इमेज

सातारा- जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्रांची’ संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे. जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये येत्या ३ महिन्यात ही सेवा केंद्रे चालू करावीत, असे स्पष्ट निर्देश राज्य सेवा हक्क आयुक्त सुधाकर तेलंग यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा हक्क आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व विभागांमधील सेवा हक्क कायद्याच्या कार्यवाही आढावा बैठकीत ते बोलत होते. तेलंग म्हणाले, ‘‘कायद्यानुसार नागरिकांना विहित वेळेत पारदर्शक सेवा देण्याचे उत्तरदायित्व निश्चित करण्यात आले आहे. सर्व शासकीय यंत्रणांनी गतिमान पद्धतीने काम करून जिल्ह्याचा सेवा वितरणाचा टक्का आणि क्रमांक उंचावण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी. सेतू आणि सेवा केंद्रांमधील व्यवस्था ही एखाद्या ‘कॉर्पोरेट’ कार्यालयाच्या धर्तीवर अद्ययावत असावी. नगरपालिका स्तरावर सर्व सेवा एकाच छताखाली देण्यासाठी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ उभारण्यात यावे, तसेच नागरी क्षेत्रात लोकसंख्येच्या प्रमाणात केंद्रांची संख्या वाढवावी. प्रत्येक शासकीय कार्यालयात दिल्या जाणार्‍या सेवा आणि ‘सेवा हक्क कायदा’ याची सविस्तर माहिती देणारे डिजिटल माहिती फलक लावण्यात यावेत. सेतू केंद्र चालकांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून, नागरिकांना अत्यल्प वेळेत अधिकाधिक उत्तम सेवा कशी देता येईल ? याचे मार्गदर्शन करावे.’’