बांगलादेशात नवीन सरकार येऊन १०० दिवस झाले, तरी हिंदू असुरक्षितच !

बांगलादेशातील सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता सुमन कुमार रॉय यांचे विधान

बांगलादेशाचे पंतप्रधान तारिक रहमान

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात तारिक रहमान यांचे सरकार स्थापन होऊन १०० दिवस झाले. यानिमित्त त्यांच्या कामाचा तेथील हिंदूंच्या जीवनावर काय परिणाम झाला, याविषयी बांगलादेशातील सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता आणि ‘बांगलादेश सनातन पार्टी’चे महासचिव श्री. सुमन कुमार रॉय यांनी सांगितले की, नवीन सरकारने सत्तेची सूत्रे हाती घेतल्यापासून एकूणच कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर चिंतेचा विषय बनली आहे. देशाच्या विविध भागांमध्ये हत्या, बेपत्ता होणे, बलात्कार, दरोडा आणि छळवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः अल्पसंख्यांक हिंदूंना वाढत्या असुरक्षिततेचा सामना करावा लागत आहे. यांतर्गत धार्मिक भावनांच्या नावाखाली होणारी आक्रमणे, तोडफोड, अपमान, भूमींवरील अतिक्रमण, मंदिरांचा ताबा आणि खंडणी वसुली यांसारख्या प्रकारांचा समावेश आहे.