गोव्यात जन्मांचे प्रमाण सर्वांत अल्प ! – ‘सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टिम’ बुलेटिन

लोकसंख्यावाढीचा वेग गोव्यात मंदावल्याचे स्पष्ट

प्रतिकात्मक चित्र

पणजी, २२ मे (वार्ता.) – गोव्यातील जन्मांचे प्रमाण देशातील सर्वांत अल्प प्रमाणांपैकी एक नोंदवण्यात आले आहे, तसेच जन्म आणि मृत्यू यांच्या प्रमाणातील भेदावर आधारित नैसर्गिक लोकसंख्यावाढीचे प्रमाण गोव्यात ४.२ आणि केरळमध्ये ३.९ आहे. नैसर्गिक लोकसंख्यावाढीची राष्ट्रीय सरासरी ११.९ इतकी आहे. यावरून गोव्यात लोकसंख्यावाढीचा वेग मंदावल्याचे स्पष्ट होत आहे. भारताच्या निबंधक महासंचालक कार्यालयाने मे २०२६ मध्ये प्रसिद्ध केलेल्या वर्ष २०२४ च्या ‘सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टिम’ बुलेटिनमध्ये ही माहिती दिली आहे.

यातील माहितीनुसार गोव्यात जन्मांचे प्रमाण प्रत्येकी १ सहस्र लोकसंख्येमागे १०.७ इतके आहे आणि ते राष्ट्रीय सरासरी १८.३ पेक्षा पुष्कळ अल्प आहे. गोव्याचा मृत्यूचे प्रमाण ६.५ असून ते राष्ट्रीय सरासरी ६.४ च्या जवळपास आहे.

बालकांच्या जीवितरक्षणाच्या संदर्भात गोवा देशात आघाडीवर

बुलेटिनमध्ये पुढे दिलेल्या माहितीनुसार गोव्यात प्रत्येकी १ सहस्र जन्मांमागे केवळ ७ बालमृत्यू नोंदवले गेले आहेत. विशेष म्हणजे गोव्यात मुलगा अन् मुलगी या दोघांचेही मृत्यूचे प्रमाण समान अन् ते ७ इतकेच आहे. हे प्रमाण राष्ट्रीय सरासरी २४ हून पुष्कळ अल्प आहे. देशातील राज्यांमध्ये मणीपूरमध्ये २ इतके अल्प बालमृत्यूचे प्रमाण नोंदवण्यात आले आहे; मात्र बुलेटिनमध्ये मणीपूरची आकडेवारी मर्यादित नमुन्यावर आधारित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. गोवा आणि सिक्कीम या दोन्ही राज्यांत बालमृत्यूचे प्रमाण ७ आहे, तर केरळमध्ये ८ आहे. त्यामुळे बालकांच्या जीवितरक्षणाच्या संदर्भात गोवा देशातील आघाडीच्या राज्यांमध्ये गणला जात आहे.