१ जुलैपासून ‘उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक’ अनिवार्य ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

नियम मोडल्यास १ सहस्र रुपये दंड !

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

मुंबई – राज्यातील वाहन सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना ‘उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक‘ (एच्.एस्.आर्.पी.) बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाने ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली असून १ जुलै २०२६ पासून नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनधारकांकडून १ सहस्र रुपये दंड वसूल केला जाईल, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. वाहनधारकांनी केवळ अधिकृत संकेतस्थळावरूनच ‘एच्.एस्.आर्.पी.’साठी नोंदणी करावी. कोणत्याही अनधिकृत व्यक्ती अथवा दलाल यांच्या आमिषाला फसू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.