देहलीत महिला आणि वृद्ध सर्वाधिक असुरक्षित !

वर्ष २०२४ मध्ये महिला आणि वृद्ध यांच्यासंदर्भात सर्वाधिक गुन्हे नोंद

नवी देहली – राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने वर्ष २०२४ मध्ये देशात झालेल्या गुन्ह्यांचा अहवाल प्रसारित केला असून यात राजधानी देहलीमध्ये महिला आणि वृद्ध यांच्या संदर्भातील गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. अहवालानुसार वर्ष २०२४ मध्ये मेट्रो शहरांमध्ये महिलांविरोधी गुन्ह्यांच्या संदर्भात देहली पहिल्या स्थानी आहे. वर्ष २०२४ मध्ये महिलांविरोधी प्रकरणांत १३ सहस्र ३९६ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, जे वर्ष २०२३ मध्ये १३ सहस्र ३६६ होते.

१. देहलीमध्ये वृद्धांच्या विरोधात १ सहस्र २६७ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. देहलीत वृद्धांविरोधी गुन्ह्यांचे प्रमाण प्रति लाख लोकसंख्येमागे ११० प्रकरणे होते, जे केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्वाधिक प्रमाणापैकी एक होते.

२. मध्यप्रदेशात सर्वाधिक, म्हणजे ५ सहस्र ८७५ गुन्हे नोंदवण्यात आले, ही संख्या वर्ष २०२३ च्या ५ सहस्र ७३८ प्रकरणांपेक्षा अधिक आहे.

३. देशात वृद्धांवरील गुन्हेगारीत चिंताजनक वाढ झाली आहे. वर्ष २०२४ मध्ये एकूण ३२ सहस्र ६०२ गुन्हे नोंदवले गेले, जे वर्ष २०२३ च्या तुलनेत १६.९ टक्के अधिक आहेत.

देशात महिलांवरील गुन्हेगारीत १.५ टक्के घट

महिलांवरील गुन्ह्यांमध्येही १.५ टक्के घट नोंदवली गेली. महिलांवरील गुन्ह्यांचे प्रमाण वर्ष २०२३ मध्ये ६६.२ वरून वर्ष २०२४ मध्ये ६४.६ पर्यंत खाली आले. वर्ष २०२४ मध्ये असे ४ लाख ४१ सहस्र गुन्हे नोंदवले गेले, तर वर्ष २०२३ मध्ये ही संख्या ४ लाख ४८ सहस्र होती.

देशभरात एकूण गुन्हे ६ टक्क्यांनी घटले

देशात एकूण गुन्हे ६ टक्क्यांनी घटले आहेत. वर्ष २०२४ मध्ये ५८ लाख ८५ सहस्र गुन्हे नोंदवले गेले, तर वर्ष २०२३ मध्ये ६२ लाख ४१ सहस्र प्रकरणे नोंदवली गेली होती.

सायबर (ऑनलाईनशी संबंधित) गुन्हेगारीमध्ये बेंगळुरू सर्वांत पुढे

देशात सायबर गुन्हेगारीचा प्रमाण वर्ष २०२३ मध्ये ६.२ टक्क्यांवरून वाढून वर्ष २०२४ मध्ये ७.३ झाले. ‘मेट्रो’ (मोठ्या आणि आधुनिक) शहरांमध्ये वर्ष २०२४ मध्ये सायबर गुन्हेगारीच्या संदर्भात बेंगळुरू प्रथम स्थानी होते. तेथे १७ सहस्र ५६१ प्रकरणे नोंदवली गेली. मेट्रो शहरांमध्ये बेंगळुरूनंतर मुंबई दुसर्‍या स्थानावर आहे. मुंबईत ४ सहस्र ९३९ प्रकरणे नोंदवली गेली. भाग्यनगरमध्ये ४ सहस्र ९ प्रकरणे नोंदवली गेली.

संपादकीय भूमिका

राजधानी देहलीची ही स्थिती लज्जास्पद ! भारतात महिलांना देवी मानले जाते, तर वृद्धांचा आदर केला जातो. त्यांची ही स्थिती कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे दर्शवणारी आहे !