शास्त्रीय संगीतासाठी ‘सराव’ नव्हे, तर ‘साधना’ आवश्यक ! – उस्ताद उस्मान खान, ज्येष्ठ सतारवादक

उस्ताद उस्मान खान, ज्येष्ठ सतारवादक

मिरज (जिल्हा सांगली) – भारतीय शास्त्रीय संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ती एक उपासना आहे. इतर क्षेत्रांत प्रगतीसाठी सराव पुरेसा ठरत असेल; मात्र शास्त्रीय संगीतात यश मिळवण्यासाठी ‘साधना’ अर्थात् रियाज आवश्यक आहे. जेव्हा तन आणि मन एकरूप होते, तेव्हाच खर्‍या अर्थाने साधना घडते, असे विधान पुण्याचे ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खान यांनी येथे केले. ‘मिरज विद्यार्थी संघा’च्या वतीने आयोजित १०१ व्या वसंत व्याख्यानमालेत ‘संगीत संस्कृती’ या विषयावर ते बोलत होते.

उस्ताद उस्मान खान यांनी शास्त्रीय संगीतातील बारकावे उलगडतांना म्हणाले की, नादातून सूर निर्माण होतो आणि त्याला लयीची जोड मिळाली की, संगीत सिद्ध होते. हेच जगातील सर्व संगीताचे सार आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील राग आणि ताल ही संकल्पना वैशिष्ट्यपूर्ण आहे. रागाचे शास्त्रीय व्याकरण असते; मात्र त्याचे कलात्मक आणि भावनात्मक रूप केवळ गुरूंकडूनच शिकावे लागते. ही भावनात्मकता हीच भारतीय संगीताची खरी श्रीमंती आहे.

उस्ताद उस्मान खान म्हणाले की, संगीत शिकतांना केवळ तांत्रिक सराव करण्याऐवजी स्वरांची पूजा (साधना) करणे महत्त्वाचे आहे. ज्या वेळी अंतर्मनाच्या तारा योग्य रितीने छेडल्या जातात, तेव्हाच श्रेष्ठ दर्जाचे संगीत रसिकांपर्यंत पोचते. शास्त्रीय संगीतातील कोणताही राग कधीही जुना होत नाही किंवा संपत नाही, हेच साधक कलाकारांचे खरे संचित आहे. व्याख्यानानंतर उस्ताद उस्मान खान यांनी सतारवादन सादर केले. त्यांच्या बहारदार वादनाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.