राष्ट्रगुरु समर्थ रामदासस्वामींसह राष्ट्रपुरुषांचा अवमान करणार्‍यांवर गुन्हा नोंद करा !

सातारा येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनाकडे मागणी

जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांना निवेदन देतांना समर्थभक्त आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी

सातारा, ६ मे (वार्ता.) – राष्ट्रगुरु समर्थ रामदासस्वामी यांच्यावर सामाजिक माध्यमांचा आधार घेत कोणतेही ऐतिहासिक पुरावे न देता, उपलब्ध पुराव्यांविषयी दिशाभूल करत राष्ट्रविघातक लोकांनी अत्यंत हीन प्रतीचे आरोप केले आहेत. सामाजिक माध्यमांवरील राष्ट्रगुरु समर्थ रामदासस्वामी यांच्यावर केले जाणारे तथ्यहीन आरोप तातडीने थांबवावेत. संबंधित राष्ट्रविघातक आणि समाजाची दिशाभूल करणार्‍या समाजविघातक शक्तींवर गुन्हा नोंद करून तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सातारा येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

या वेळी ‘श्री समर्थ सेवा मंडळा’चे कार्याध्यक्ष पू. योगेशबुवा रामदासी, समर्थभक्त शहाजीबुवा रामदासी, श्रीसमर्थ सदन येथील व्यवस्थापक समर्थभक्त प्रवीण कुलकर्णी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु जनजागृती समिती, हिंदु महासभा, सनातन संस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद, महाराष्ट्र मंदिर महासंघ, बजरंग दल, श्री संप्रदाय, इस्कॉन, हिंदु विधीज्ञ परिषद आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

निवेदनात नमूद करण्यात आले की,

१. ‘समर्थ रामदासस्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची परस्परांशी भेट झालीच नाही’, ‘रामदासस्वामी हे आदिलशहाचे हेर होते’ यांसारख्या गलिच्छ आरोपांपासून ते समर्थांच्या सूर्यप्रकाशाहून कोटीगुणांनी स्वच्छ असणार्‍या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यापर्यंतही या राष्ट्रविघातक लोकांची मजल गेली आहे.

२. अलीकडील काळात काही लोकांनी अर्धवट माहितीच्या आधारे केलेल्या विधानांचे निमित्त करून पुन्हा एकदा समर्थ रामदासस्वामींवर चिखलफेक करण्याचे कार्य या राष्ट्रविघातक लोकांनी चालू केले आहे.

३. यामुळे राष्ट्रगुरु समर्थ रामदासस्वामी त्याचप्रमाणे इतर राष्ट्रपुरुष, संत यांच्यावर अशा प्रकारे अर्वाच्च भाषेत टीका करून समाजामध्ये तेढ निर्माण करणार्‍यांवर कडक कारवाई व्हावी. तसेच यासाठी लवकरात लवकर कठोर कायदाच व्हावा.

४. अलीकडच्या काही वर्षांमध्ये या महापुरुषांना जातींमध्ये विभागून, त्यांच्या अपकीर्तीचे वारंवार प्रयत्न केले जात आहेत. हे प्रयत्न केवळ जातीय द्वेषातून होत नसून आपल्या देशाच्या आदर्श व्यक्तीमत्त्वांविषयी समाजमनात जाणीवपूर्वक वाईट विचार उत्पन्न करून त्यांना भ्रमित करण्याचे आणि त्यायोगे आपल्या देशाची विचारधारा नष्ट करण्याचे मोठे कारस्थान आहे.

निवेदनामध्ये पुढे म्हटले आहे की, श्रीसमर्थ रामदासस्वामी यांनी समाजात देव, देश आणि धर्माविषयी निष्ठा वाढवण्यासाठी लोकोत्तर कार्य केले. समर्थ रामदासांनी खडतर तपश्चर्या, प्रचंड अभ्यास आणि प्रखर साधनेच्या बळावर समाजात लोकजागृतीचे अन् अध्यात्मप्रसाराचे कार्य केले. त्यांनी संघटनकौशल्याच्या आधारे धर्माच्या आणि राष्ट्राच्या पुनरुत्थानाचे कार्य केले. त्यासाठी त्यांनी देशभरात १ सहस्र १०० मठांची स्थापना केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याला हे सर्व कार्य पूरकच ठरले. त्यामुळेच या दोन्ही महापुरुषांना परस्परांविषयी अत्यंत आत्मियता होती. हे समकालीन पुराव्यांवरून वारंवार सिद्ध झाले आहे.

संपादकीय भूमिका

अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वत:हून कारवाई केव्हा करणार ?