महाराष्ट्रात खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकीट दरांत दुप्पट-तिप्पट वाढ !

मुंबई – उन्हाळी सुटीनिमित्त खासगी ट्रॅव्हल्स आस्थापनांनीही तिकिटांचे दर दुप्पट-तिप्पट वाढवले आहेत. कोल्हापूर, कोकण, सोलापूर आणि नाशिक या मार्गांवर तिकिटांचे दर भरमसाठ वाढवलेले आहेत. यावर परिवहन विभागाचे कोणतेही नियंत्रण दिसून येत नसल्याने प्रवासीही टीका करत आहेत.

१. झोपण्याची व्यवस्था असलेल्या वातानुकूलित बसमध्ये २ सहस्र ते २ सहस्र ५०० रुपये, तर बसून करण्याच्या प्रवासासाठी १ सहस्र ५०० ते १ सहस्र ८०० रुपये आकारले जात आहेत. हे तिकीट एरव्ही ६०० ते ८०० रुपयांत उपलब्ध असते.

२. ‘वर्षभर आमचे दर हे शासकीय गाड्यांच्या तुलनेत समान किंवा न्यून असतात; मात्र देखभाल आणि कर्मचार्‍यांचे वेतन यांवरील ताण लक्षात घेता सणासुदीच्या काळात दर वाढवावे लागतात’, असे खासगी ट्रॅव्हल्सचे मालक प्रदीप पाटील म्हणाले. (या सगळ्याचा भुर्दंड सामान्यांनाच का ? असे करणे म्हणजे प्रवाशांची लूट करण्याचा प्रकार आहे ! – संपादक)

३. ‘कोल्हापूरसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या जादाच्या गाड्या नाहीत आणि रेल्वेचे तिकीटही मिळणे कठीण असते. त्यामुळे महागडे तिकीट घेण्याविना पर्याय नसतो. शासनाने कोकणाप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रासाठीही जास्तीच्या गाड्या चालू कराव्यात’, असे प्रवासी रोहन पवार यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

  • सुटी आणि प्रवाशांची लूट हे समीकरणच झाले आहे. प्रवाशांनीच याविरोधात वैध मार्गाने आवाज उठवून खासगी ट्रॅव्हल्सना खडसवायला हवे !
  • ठरलेल्या प्रमाणापेक्षाही दुप्पट-तिप्पट दरवाढ ही वाजवीपेक्षा अधिकच आहे ! असे करणार्‍यांकडून याची दंडवसुली करून घ्यायला हवी !