गोविंद पानसरे यांचे छत्रपती शिवरायांविषयीचे पुस्तक इतिहासाचा विपर्यास करण्यासाठीच !

प्रसिद्ध व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचा गंभीर आरोप

आंतरराष्ट्रीय प्रवचनकार आणि व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे

मुंबई – डाव्या विचारांच्या लोकांना लेनिन, माओ यांच्याविषयी प्रेम आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी त्यांना कधीपासून प्रेम वाटायला लागले ? इतिहासाचा विपर्यास करण्यासाठी गोविंद पानसरे यांनी जाणीवपूर्वक ‘शिवाजी कोण होता ?’ हे पुस्तक लिहिले आहे, असा गंभीर आरोप आंतरराष्ट्रीय प्रवचनकार आणि व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केला. गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ‘सनातन प्रभात’शी बोलतांना डॉ. शेवडे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

डॉ. शेवडे म्हणाले, ‘‘गोविंद पानसरे यांनी लिहिलेले पुस्तकातील लिखाण खरे मानायचे झाले, तर ज्यांनी महाराजांचा इतिहास समजून घेण्यासाठी हाडाची काडे केली, आयुष्य झिजवले, अशा गजानन मेहेंदळे यांच्यासारख्या इतिहास संशोधकांनी लिहिलेला इतिहास खोटा ठरवायचा का ? गजानन मेहेंदळे यांच्या प्रत्येक लिखाणाला संदर्भ आहे. इतिहास दोन प्रकारचा असतो. काही जण इतिहास मांडतात, तर काही जण इतिहास पाडतात. गोविंद पानसरे यांचे लिखाण दुसर्‍या प्रकारातील आहे.’’

स्वत:च्या नावापुढे ‘कॉम्रेड’ आणि महाराजांचा उल्लेख मात्र एकेरी !

पानसरे यांचे नाव लिहितांना त्यांच्या नावापुढे ‘कॉम्रेड’ लावण्याचा पुरो(अधो)गाम्यांचा आग्रह असतो. तसे केले नाही, तर त्यांचा अवमान मानला जातो; परंतु गोविंद पानसरे स्वत: छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख एकेरी करतात, तो पुरोगाम्यांना कसा चालतो ? बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेले विधान चुकीचे होते; परंतु त्यांनी रवींद्रनाथ ठाकूर यांच्या एका कवितेतील संदर्भावरून विधान केले होते. त्यांची चूक त्यांना दाखवून द्यायला हवी; पण तसे न करता त्यांना शिव्या दिल्या गेल्या; परंतु गोविंद पानसरे यांनी ‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकात महाराजांना ‘सर्वधर्मसमभावी’ असलेले दाखवले आहे. त्या पुस्तकाच्या प्रती वितरित केल्या जातात. या पुस्तकावरून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे आणि त्यासाठी १ लाख रुपयांचे पहिले पारितोषिक ठेवण्यात आल्याचे वाचनात आले. या पारितोषिकातील ९० सहस्र रुपयांच्या पुस्तकाच्या प्रती वितरित केल्या जाणार आहेत.. हा पुस्तक खपवण्याचा धंदा आहे, अशी टीका डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केली.