१ जूनपासून राज्यातील सर्व स्वच्छतागृहांमध्ये प्रवाशांना विनामूल्य सेवा ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री, राज्य परिवहन महामंडळ 

कोल्हापूर बसस्थानकाची पहाणी करतांना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

कोल्हापूर, १७ एप्रिल (वार्ता.) – राज्यात अनेक ठिकाणी स्वच्छतागृहांमध्ये ठरवून दिलेल्या मूल्यापेक्षा अधिक रक्कम आकारल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी १ जूनपासून राज्यातील सर्व स्वच्छतागृहामंध्ये प्रवाशांना विनामूल्य सेवा देण्यात येईल. सध्या एस्.टी. प्रत्येक तिकिटावर २ रुपये स्वच्छतेसाठी जो अधिभार घेत आहे, त्यातून ही सेवा देण्यात येईल. येणार्‍या वर्षात ८ सहस्र बसगाड्या एस्.टी. महामंडळ घेणार असून टप्प्याटप्याने प्रत्येक जिल्ह्याला या गाड्या देण्यात येतील, अशी माहिती राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. कोल्हापूर बसस्थानकाची पहाणी केल्यावर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली.

मंत्री प्रताप सरनाईक पुढे म्हणाले, ‘‘यापुढील काळात सर्व बसस्थानकांवर जिथे चालकांचे निवासस्थान आहे, ते स्वच्छ ठेवण्यात येईल, तसेच त्यांना स्नान करण्यासाठी गरम पाणी उपलब्ध करून देण्यात येईल. सर्व पाणपोई ठेकेदारांना पिण्याचे पाण्याच्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्यास सांगितले असून प्रवाशांना स्वच्छ पाणी देण्यासाठी आमचे यापुढे प्रयत्न असतील. काही प्रवासी अन्नपदार्थ खाल्यानंतर त्याचे कागद, प्लास्टिक पिशव्या बसगाडीत टाकतात आणि गाडी अस्वच्छ होते, हे टाळण्यासाठी १ जूनपासून गाडीतच ‘कचरापेटी’ ठेवण्यात येईल आणि प्रवाशांना त्यातच कचरा टाकण्याच्या सूचना देण्यात येतील.’’

प्रारंभी प्रताप सरनाईक यांनी बसस्थानकावरील ‘पेपर स्टॉल’ला भेट देऊन तेथील व्यवस्थेविषयी समाधान व्यक्त केले. यानंतर उपाहारगृह, स्वच्छतागृह, बसस्थानक परिसर, तसेच हिरकणी कक्ष यांची पहाणी केली. या प्रसंगी एस्.टी. विभाग नियंत्रक अभय देशमुख, स्थानकप्रमुख मल्लेश विभूते, आगार व्यवस्थापक प्रमोद तेलवेकर, विभागीय वाहतूक अधिकारी अनिल म्हेतर यांसह अनेक अधिकारी उपस्थित होते.

परिवहनमंत्री येण्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या ३ दिवसांपासून कोल्हापूर एस्.टी. बसस्थानक परिसराची स्वच्छता चालू होती. यामुळे संपूर्ण बसस्थानक परिसर ‘चकाचक’ झाला होता.
उपाहारगृहातील खाद्यपदार्थांच्या दरपत्रकावर अशा प्रकारे निळी पट्टी का लावण्यात आली ? असा प्रश्न उपस्थित करतांना परिवहनमंत्री प्रताप सरनाइक

एस्.टी.च्या उपाहारगृहातील खाद्यपदार्थांच्या सूचीच्या किमतीवर पट्टी लावल्याने परिवहनमंत्री संतापले !

बसस्थानक परिसरात पहाणी करत असतांना परिवहनमंत्र्यांना उपहारगृहातील खाद्यपदार्थांच्या सूचीच्या मूल्यावर पट्टी लावलेली आढळली. ‘प्रवाशांना ३० रुपयांमध्ये चहा आणि अल्पाहार देणे अपेक्षित असतांना पदार्थांच्या मूल्यावर पट्टी का ?’ असा संतप्त प्रश्न परिवहनमंत्र्यांनी या प्रसंगी उपस्थित केला. संबंधित अधिकार्‍यांना बोलावून ‘याकडे त्यांचे लक्ष नाही का ?’, असाही प्रश्न परिवहनमंत्र्यांनी उपस्थित केला.

या संदर्भात एस्.टी.चे एक अधिकारी पत्रकारांना माहिती देतांना म्हणाले, ‘‘सध्या गॅसचे दर वाढलेले असून उपाहारगृह मालकास काही पदार्थ चुलीवर करावे लागत होते. त्यामुळे तो नवीन दरपत्रक लावणार होता, तसेच अशी पट्टी न लावण्याच्या सूचना संबंधित मालकास कालच केल्या होत्या.’’