आषाढी वारीसाठी प्रशासनाची सिद्धता

वारकर्‍यांची सोय, स्वच्छता आणि सुरक्षा यांना प्राधान्य

श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्त निवास’ येथे झालेल्या बैठकीत उपस्थित जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस्. (मध्यभागी)

पंढरपूर – आषाढ शुक्ल एकादशीनिमित्त होणार्‍या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांसह अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाने पूर्वसिद्धता चालू केली आहे. लाखो वारकरी भाविकांच्या सोयीसाठी पाणी, आरोग्य, सुरक्षा, शौचालय व्यवस्था आणि स्वच्छता यांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे, अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस्. यांनी दिली. यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास येथे बैठक झाली. यामध्ये पालखी मार्गावरील रस्ते वारीच्या आधी दुरुस्त करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. पालखीतळ, विसावा आणि रिंगण स्थळी भाविकांसाठी मुबलक पाणी आणि शौचालये यांची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यासमवेत स्वच्छतेसाठी अधिकचे मनुष्यबळ आणि आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. ‘फिरते अन्न पडताळणी वाहनां’ची (‘फूड सेफ्टी ऑन व्हील’ची) संख्या वाढवली जाणार आहे. वारीच्या काळात खासगी रुग्णालयांत किमान १० टक्के खाटा राखीव ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत.